खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत बच्चू कडू यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Politics: मुंबई: राज्यामध्ये पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीसाठी आवाज उठवला जात आहे. प्रहार नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या पूर्णकर्जमाफीसाठी आंदोलन झेडले. नागपूरमध्ये हजारो शेतकऱ्यांसह कडूंनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे नागपूरमध्ये पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकीय हालाचालींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील बच्चू कडूंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. जोपर्यंत कर्जमाफी आणि साताबार कोरा करण्याविषयी सरकार ठोस भूमिका जाहीर करणार नाही. तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका बच्चू कडूंनी जाहीर केली आहे. त्यावर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,” कडू हे लढवय्ये नेते आहेत. मनोज जरांगे हे आपल्या मागण्या मान्य करून मुंबईतून परत गेले. बच्चू कडूंना आता साताबारा कोरा करण्यात जर यश मिळालं तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. कारण सातबारा कोरा करणं आणि कर्जमाफी या संज्ञा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या असल्याचा दावा त्यांनी केला. साताबारा कोरा झालाच पाहिजे यासाठी संघर्ष सुरू आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी जाहीर केली होती. आताही त्या पद्धतीने कर्जमाफी व्हायला हवी ही आमच्या सर्वांचीच भूमिका आहे,” असे ठाम मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपूर्वी मतचोरीचा आरोप झाल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. महाविकास आघाडीच्या या आरोपाला आता मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला आहे. निवडणूक आयोगाकडून ही मतचोरी होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. खासदार राऊत म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी देखील मोठं विधान केलं. मतांची चोरी होत असल्याचा राज ठाकरेंचा देखील दावा आहे. मत कुठे जातात त्या संदर्भात माहिती देत असतील आदित्य ठाकरे यांनी वरळीमधील माहिती दिली. तर राहुल गांधी यांनी देशभरातल्या मतदार यादीतही घोळ समोर आणला आहे,” असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही एमसीए पदाधिकारी आणि क्रिकेट जगतातील दिग्गजांनी बोर्डाला राजकारणापासून लांब ठेवण्याचे सांगितले आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “क्रिकेटमध्ये राजकारणी घुसल्याचे ते म्हणाले. एकेकाळी चांगले क्रिकेटर्स आणि चांगले प्रशासक एमसीएमध्ये होते. गेल्या काही दिवसांमध्ये एमसीएच्या क्रिकेटर्सचा बाजार झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की पडद्यामागच्या खेळामध्ये आपण सहभागी व्हावं. भारतीय क्रिकेटला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम शरद पवार यांनी केल्याचे राऊत म्हणाले. त्यानंतर अनेकांचे डोळे क्रिकेटकडे वळले. भाजपचा आणि क्रिकेटचा तसा संबंध आला नव्हता. पण गेल्या तीन ते चार वर्षात तो वाढला आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की क्रिकेट हा ऑल पार्टी बोर्ड आहे,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.






