
MP sanjay Raut target modi government over LPG Gas shortage Iran-Israel War
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युद्धाचे पडसाद भारतामध्ये पडू लागल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ही मोदी सरकारची चूक असल्याची टीका देखील खासदार राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “केंद्र सरकारचे भारताला शंभर वर्षे मागे नेण्याचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे गाड्या रस्त्यावर धावण्याऐवजी पुन्हा एकदा बैलगाड्यांचे युग येईल की काय, अशी भीती संजय राऊतांनी व्यक्त केली. यावेळी त्यांना महाराष्ट्रात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, पण मोदी आणि त्यांचे भक्त या इंधन टंचाईवर एक शब्दही बोलायला तयार नाहीत,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : उद्या राजकारणात भूकंप येणार? संसदेत Om Birla यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; BJP चा प्लॅन काय?
पुढे संजय राऊत यांनी मोदी सरकारवर उपरोधक टीका केली. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदी हे एक मोठे संशोधक आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी नाल्यातून गॅस निर्मिती करण्याचा शोध लावला होता. नाल्यात पाईप टाकून त्यातून निघणाऱ्या गॅसवर घरातील चुली पेटवता येतात, असे त्यांनी सांगितले होते. आता देशावर इंधनाचे संकट असताना मोदींच्या या संशोधनाचा फायदा देशाला व्हायला हवा. मोदींच्या या संकल्पनेतून मुंबईतील मिठी नदीच्या किनाऱ्यावर गॅस निर्मितीचा पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू करावा. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना आवर्जून बोलवावे. या कामासाठी लागणारे पाईप्स किंवा इतर आवश्यक साहित्याची व्यवस्था शिवसेना म्हणून आम्ही करायला तयार आहोत. मिठी नदी यशस्वी झाली की यमुना नदीवरही असाच प्रयोग करता येईल,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे.
हे देखील वाचा : “हे परराष्ट्र धोरणाचे अपयश..! गॅस तुटवड्यावरुन विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा
“सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील इंजिनिअरिंग प्लांट्सना गॅसची मोठी गरज असते. मात्र, पुरवठा थांबल्याने हे उद्योग आता पूर्णपणे संकटात आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि चाकण येथे असणाऱ्या ऑटोमोबाईल हबला मोठ्या प्रमाणात इंधन लागते मात्र इंधन टंचाईचा मोठा फटका बसला आहे. या संकटामुळे केवळ उद्योगच नाही, तर शेतकरी, कष्टकरी वर्ग, हॉटेल व्यावसायिक आणि टाईल्स उत्पादकही भरडले जात आहेत. हॉटेल्स व्यवसाय बंद आहेत,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.