
'ऑपरेशन टायगर फत्ते; चौकार नाही, थेट षटकार, २०२९ साली सहाच्या सहा खासदार पुन्हा निवडून येणार,' एकनाथ शिंदेंची ग्वाही
४० आमदारांपासून सुरू झालेल्या २०२२ च्या राजकीय उठावानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळणारा पाठिंबा सातत्याने वाढत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “आता एक नाही तर सहा टायगर आमच्यासोबत आहेत. चौकार नाही, षटकार मारला आहे,” असे सांगत शिंदे यांनी हा प्रवेश बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विजयाचा आणि शिवसेनेच्या वाढत्या ताकदीचा पुरावा असल्याचा दावा केला.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले, तसेच पक्षाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सहा खासदारांचे स्वागत करताना शिंदे म्हणाले की, २२ जून २०२२ रोजी शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा वाचवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्याचा हा दुसरा टप्पा आहे. सुरुवातीला ४० आमदार सोबत होते, तर आज सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करून त्या लढ्याला नवे बळ दिले आहे. “आता एक नाही तर सहा टायगर आपल्या सोबत आहेत,” असे ते म्हणाले.
बाळासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा असलेले शिवसैनिक अखेर शिवसेनेतच एकवटतात, असे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, “जिथे शिवसेनेचे विचार, तिथे शिवसैनिक. त्यामुळेच हे सहा खासदार आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत आले आहेत.”
या सर्व खासदारांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, विकास, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि जनतेची कामे हा त्यांचा प्रमुख विचार होता. काहींनी टीका केली, आरोप केले, परंतु त्यांनी जनतेच्या हिताला प्राधान्य दिले.
प्रवेश केलेल्या प्रत्येक खासदाराच्या कार्यशैलीचे कौतुक करताना शिंदे यांनी संजय बंडू जाधव यांना जमिनीशी नाळ जोडून काम करणारे कार्यकर्ते, संजय दिना पाटील यांना बेधडक आणि सामान्य माणसांचा कैवारी, तर ओमराजे निंबाळकर यांना “रिअल स्टार” असे संबोधले. संजय देशमुख यांच्या कामाचे कौतुक करत त्यांनी त्यांना आणखी मोठ्या प्रमाणावर काम करण्यासाठी शिवसेना व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असे सांगितले. नागेश पाटील आष्टीकर यांच्या बिंदास स्वभावाचा उल्लेख करताना, त्यांच्या वाटेला जाणाऱ्यांना त्यांची ताकद समजेल, असे ते म्हणाले. भाऊसाहेब वाकचौरे यांना “गावातही वाघ आणि राजकारणातही वाघ” असे संबोधत त्यांनी त्यांचे विशेष स्वागत केले.
“हे खासदार कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी आलेले नाहीत. ते मतदारसंघाच्या विकासासाठी, कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिवसेनेत आले आहेत,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण प्रक्रिया कायदा, संविधान आणि संसदीय परंपरांच्या चौकटीत पार पडल्याचे स्पष्ट करत त्यांनी विश्वास व्यक्त केला की, आज शिवसेनेत आलेले हे सर्व खासदार भविष्यात धनुष्यबाण चिन्हावरच निवडून येतील. दरम्यान, कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.