
प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार? राज्यसभा निवडणुकीनंतर महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच 10 राज्यांतील ३७ जागांसाठी राज्यसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार गटातील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे किंवा श्रीरंग बारणे यापैकी एका नावावर विचार सुरू असल्याची माहिती आहे.
अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. शिंदे गट आपले राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे गटातील खासदारांमध्येही फूट पाडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असून ‘ऑपरेशन टायगर’वर काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाधिक खासदारांना सोबत घेऊन केंद्रात आपली ताकद वाढवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. सध्या शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पदोन्नती देऊन कॅबिनेट मंत्री करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काहींचा पत्ता कटणार?
मंत्रिमंडळ फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना वगळले जाऊ शकते, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरण रोखण्यात भूमिका
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणासाठी शरद पवार गटाकडून दबाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप नेतृत्व चिंतेत होते. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरण रोखण्यात तसेच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासाठी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते. त्यामुळे या राजकीय संकटाचे व्यवस्थापन केल्याबद्दल प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद देऊन सन्मानित केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
हेदेखील वाचा : Satara Politics : सातारा जिल्हा परिषदेत सत्तेची ‘गुढी’ उभारणार कोण? अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
बारामती पोटनिवडणुकीवरून राजकारण सुरु
बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे आता या जागेवर पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न असतानाच ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.