OBC Bachao Morcha: दौंड तालुक्यातील पाटस येथून मुंबईकडे मंगळवारी (1 सप्टेंबर) सकाळी दहा वाजता निघालेला ओबीसी बचाव मोर्चा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोल नाक्यावर पोलिसांनी रोखल्याने मोठा गोंधळ उडाला. यवत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे तब्बल तीन साडेतीन तास आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत वाहतूक रोखून धरली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
राज्यातील ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी, बोगस आणि बनावट ओबीसी जातीचे दाखले रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
आज सकाळी १० वाजता पाटस येथील राजमाता अहिल्याबाई होळकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा सकाळी ११ वाजता पाटस टोलनाक्यावर येऊन धडकला. टोलनाक्यावरून मुंबईच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला असता, पोलीसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चा रोखला.
यावेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक गिल यांनी मोर्चाला परवानगी नसल्याने पुढे जाता येणार नाही, असे आंदोलकांना सांगितले. मात्र, आंदोलकांनी पोलिसांचे म्हणणे फेटाळून लावत मुंबईकडे जाण्यावर ठाम भूमिका घेतली.
परवानगी नाकारल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी पुणे-सोलापूर महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यामुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी दोन-तीन वेळा सविस्तर चर्चा केली, मात्र हाके आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. परिणामी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आणि पाटस-दौंड-अष्टविनायक मार्गावर चारही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली. शेकडो वाहने अडकून पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
तीन ते साडेतीन तासानंतर पोलिस अधीक्षक गिल आणि लक्ष्मण हाके यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या मोर्चाला पुढे जाण्यास सशर्त परवानगी देण्यात आली. त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. या आंदोलनामुळे पाटस आणि टोलनाका परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आमचा मोर्चा शांततेत आहे. बोगस दाखले रद्द करा हीच आमची मागणी आहे. आम्हाला कितीही रोखले तरी ओबीसींचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचवणारच, असे लक्ष्मण हाके यांनी यावेळी ठणकावून सांगितले






