लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला बबनराव तायवाडेंचा विरोध
मुंबई : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनासाठी हाके यांनी राज्यभरातील ओबीसी बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन केले असून, ओबीसी नेत्यांनाही या मोर्चात सहभागी होण्याचे आवतन दिले आहे. मात्र, मोर्चापूर्वीच ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी हाके यांच्या मोर्चाला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेतृत्वातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
बबनराव तायवाडे यांनी हाके यांच्या आंदोलनावर भूमिका स्पष्ट करताना सरकारच्या भूमिकेकडे आपले लक्ष असल्याचे सांगितले. सरकार ओबीसी आरक्षणाच्या मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहते आणि आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही याची खात्री करते का, यावर आपले लक्ष असल्याचे त्यांनी म्हटले.
सरकारने दिलेल्या आश्वासनांवर ते ठाम राहिल्यास मुंबईत मोर्चा काढण्याची गरज नसल्याचे तायवाडे यांनी सांगितले. हाके यांच्या मागण्या स्पष्ट नसल्याचा दावाही करत त्यांनी या मोर्चाला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले.
ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही तायवाडे यांनी उपस्थित केला. २०१६ पासून केंद्र सरकारकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
जातनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना असावा, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी आगामी काळात सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून, डिसेंबरमध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्याचा इशाराही तायवाडे यांनी दिला.
तायवाडेंच्या भूमिकेवर लक्ष्मण हाके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बबनराव तायवाडे हे ‘इव्हेंट नेते’ असल्याची टीका त्यांनी केली. तायवाडे सकाळी एक, दुपारी दुसरी आणि संध्याकाळी वेगळी भूमिका घेत असल्याचा आरोप हाके यांनी केला. “आम्ही त्यांना पाठिंबा मागितलाच नाही,” असे सांगत हाके यांनी तायवाडे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने भूमिका घेत असल्याचा आरोप केला. वर्षातून एक कार्यक्रम घेणाऱ्या तायवाडेंनी आपल्याला अधिक बोलायला लावू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबरच्या मुंबईतील मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र, बबनराव तायवाडे यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने मोर्चापूर्वीच ओबीसी नेतृत्वातील मतभेद अधोरेखित झाले आहेत. त्यामुळे १ सप्टेंबरच्या मोर्चाला ओबीसी समाजातून किती प्रतिसाद मिळतो आणि या आंदोलनामुळे सरकारवर किती दबाव निर्माण होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






