पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर RSS मोहन भागवत यांनी भूमिका केली स्पष्ट (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद आणि हिंसाचार डोके वर काढत आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. पर्यटकांना लक्ष्य करुन आणि धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यावरुन संपूर्ण देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच जगात एकच धर्म आहे तो म्हणजे मानवधर्म आणि हिंदू धर्म हाच मानवधर्म असल्याचे देखील मोहन भागवत म्हणाले आहेत.
विलेपार्ल येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये मोहन भागवत हे भाषण करत होते. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ला आणि भारताची भूमिका यावर भाष्य केले. मोहन भागवत म्हणाले की, जगात एकच धर्म आहे तो म्हणजे मानव धर्म. त्यालाच हिंदू धर्म म्हणतात. आपल्या जवानांनी किंवा आपल्याकडच्या लोकांनी कधी कुणाला धर्म विचारून लोकांना मारलेले नाही. काल कट्टरपंथीयांनी जो उत्पात केला, तसा हिंदू कधीही करणार नाही. पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील. त्यामुळेच आपला देश बलवान पाहिजे”, अशी भूमिका मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या पहलगाम हल्ल्यामध्ये 27 निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत भागवत म्हणाले की, “आपल्या मनात दुःख आहे. सगळ्यांची अंतःकरण जड झाली आहेत. या सर्व कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. पण आमच्या मनात क्रोधही आहे. तो असला पाहिजे. असुरांचं निर्दालन व्हायचं असेल, तर अष्टादश भुजांची शक्ती असलीच पाहिजे. चांगलेपणा दुरुस्त करण्याचे सृष्टीचे जे मार्ग आहेत, त्यात एक मार्ग समजावून देण्याचा असतो. अनुभवातून मनुष्य शिकतो आणि सुधारतो. काही लोक असे असतात जे सुधरतच नाही. जे शरीर, मन त्यांनी धारण केलंय, त्यात परिवर्तन शक्य नसतं,” असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. तसेच आक्रमक भूमिका घेतली आहे.
रावणाच्या प्रवृत्तीचे उदाहरण देत त्यांनी भूमिका स्पष्ट करुन सांगितली आहे. भागवत म्हणाले की, “रावण शिवभक्त होता, वेदशास्त्रसंपन्न होता. एक चांगला माणूस बनण्यासाठी जे काही आवश्यक असतं, ते सगळं त्याच्याकडे होतें. पण जे शरीर-मन-बुद्धी त्याची बनली, ती बदलायला तयार नव्हती. दुसरा उपायच नव्हता. रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा देह धारण करत नाही त्याशिवाय तो सुधारणार नाही. त्यामुळे रावण सुधारला पाहिजे. म्हणून रामानं त्याचा वध केला. अशा दुष्ट माणसांचं निर्दालन झालं पाहिजे. क्रोध आहे, अपेक्षाही आहेत. त्या अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतं मला”, असा विश्वास आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्र सरकारबाबत व्यक्त केला आहे.
पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दहशतवादींच्या हिंसक प्रवृत्तीवरुन देखील मोहन भागवत यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की, “द्वेष, शत्रुता हा आपला स्वभाव नाही. पण मार खाणं हाही आपला स्वभाव नाही. शक्तीवान माणसाला अहिंसक असायला हवं. जो दुर्बल आहे, त्याला हे व्हायची गरजच नाही. त्याला व्हाव लागतं अहिंसक. म्हणून शक्ती असायला हवी. ती दिसलीही पाहिजे, म्हणजे जगाला कळतं हे शक्तीवान आहेत, यांच्या वाट्याला जाऊ नये. मग जगातल्या दुष्ट लोकांनाही हे समजतं”, अशा शब्दांत मोहन भागवत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.