दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, 'पक्षाचे...' (संग्रहित फोटो)
पंढरपूर : शरद पवार गट आणि अजित पवार गट म्हणजेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याबाबत दोन्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील. त्यांचा निर्णय झाल्यावर तो सर्वांनाच कळेल, असे संकेत माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.
पंढरपूर येथे ते शनिवारी पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकार पुन्हा एकदा मतदारसंघ रचनेबाबत विधेयक आणण्याच्या तयारीत असून हे होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पडद्यामागे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आणण्याबाबत काही हालचाली सुरू असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले. दरम्यान, अर्थमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली असून, यासाठी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी मी अर्थमंत्री होणार, ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये सुरू असून याबाबतचा अंतिम निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी योग्य वेळी घेतील, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
अर्थमंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी संबंधितांशी बोलत असतील तर मला माहित नाही. मात्र, ज्यावेळी त्याचा निर्णय होईल तेव्हा तो सर्वांनाच कळेल. राजकारणात उद्या नेमके काय घडेल हे कधीच आधी सांगता येत नसते. त्यामुळे थोडी वाट पाहू आणि चांगलेच ऐकायला मिळेल, असे सूचक संकेतही त्यांनी यावेळी दिले.
सुनेत्रा पवार यांनी वारकऱ्यांसोबत घेतला महाप्रसाद
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंढरपूर दौऱ्यादरम्यान आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी नवीन भक्त निवास इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासही त्या उपस्थितीत होत्या. भक्तनिवास परिसरात आयोजित वारकऱ्यांच्या भक्ती पंगतीमध्ये वारकऱ्यांनी केलेल्या आग्रहाचा मान राखत सुनेत्रा पवार यांनी त्यांच्यासोबत पंगतीत बसून महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यांच्या या साधेपणाच्या आणि वारकरी परंपरेप्रती असलेल्या आदराच्या भावनेचे उपस्थित वारकऱ्यांनी स्वागत केले.






