
Sanjay Raut
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य सरकारकडून दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे देण्यात आली आहे. तर नाशिकचे पालकमंत्री म्हणून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाकडून जल्लोष करण्याची तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपकडून करण्यात येणाऱ्या जल्लोषावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. पालकमंत्रिपद मिळाल्याचा इतका मोठा जल्लोष करण्याची गरज काय, असा सवाल करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
पालकमंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातील असताना नाशिक आणि रायगडच्या पदांवरून दिल्लीपर्यंत चर्चा का झाली, असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला. या निर्णयामागे राजकीय तडजोड झाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली.
ते म्हणाले, “निर्लज्ज लोक आहेत. पहिल्यांदाच पालकमंत्रिपद मिळालं आहे का? यांच्याकडे अकलेचा दुष्काळ आहे. हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे असं म्हणतात. पण हा दोन जिल्ह्यांचा वाद अमित शाह यांच्याकडे न्यायचे, पंतप्रधानांकडे न्यायचे. याबाबत तडजोड झाली. मुंबईच्या भाषेत मांडवली झाली.”
गिरीश महाजन यांच्याशी आपले व्यक्तिगत वैर नसल्याचे सांगतानाच, नाशिकमधील विकासकामे, रस्त्यांची स्थिती आणि नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी महाजनांना लक्ष्य केले. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणून कामे करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
SIR प्रक्रियेवर रोहित पवारांचा गंभीर आरोप; मतदारांचा हक्क धोक्यात असल्याचा दावा
दुसरीकडे, नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा मिळाल्यानंतर गिरीश महाजन यांनी आनंद व्यक्त केला. पंढरपूरमध्ये दर्शन घेत असताना पत्नीने कानात नाशिकचे पालकमंत्री झाल्याची बातमी सांगितल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महाजन म्हणाले की, यंदाचा महाकुंभ ‘न भूतो न भविष्य’ असा होईल. महाकुंभाच्या माध्यमातून नाशिकचा चेहरा-मोहरा बदलण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाकुंभाच्या तयारीपासून ते शहरातील पायाभूत सुविधांपर्यंत अनेक आव्हाने प्रशासनासमोर आहेत. त्यामुळे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्यासमोर नाशिकच्या विकासासोबतच महाकुंभाचे नियोजन ही मोठी जबाबदारी असणार आहे.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय झाल्यानंतर आता दोन्ही जिल्ह्यांच्या विकासकामांना किती वेग मिळतो आणि महायुतीतील या निर्णयाचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे लक्ष लागले आहे.