
Shiv Sena Shinde group City Chief Nilesh More Resigns Satara Political News
Satara News : सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गांधी मैदानावर होणारा भव्य मेळावा अवघ्या तोंडावर आला असताना साताऱ्यात पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. शहरप्रमुख निलेश मोरे यांनी दिलेल्या राजीनाम्याने केवळ एक पद रिकामे झाले नाही, तर शहरातील बूथ प्रमुखांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे संघटनाच हादरली आहे.(Political News) या राजीनाम्याला “लेटर बॉम्ब” असेच संबोधावे लागेल, कारण त्यातून उघड झालेले आरोप थेट पक्षाच्या अंतर्गत कारभारावर बोट ठेवणारे आहेत.
शहरप्रमुख निलेश मोरे यांनी आपल्या राजीनामा पत्रातून संपर्कप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला आहे. “कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करायचे आणि श्रेय-निधी मात्र नातेवाईकांना?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विकास निधीच्या वाटपात झालेला कथित पक्षपात, नियोजन समितीतून ऐनवेळी नाव वगळणे, आणि सातत्याने डावलण्याचा आरोप या सगळ्यामुळे स्थानिक पातळीवरील असंतोष उघडपणे समोर आला आहे.
हे देखील वाचा : खून केल्यानंतर कोयते उगारून आरोपींची दहशत; शिवाजीनगर भागातील धक्कादायक घटना
विशेष म्हणजे, हा बंडाचा सूर एखाद्या नाराज कार्यकर्त्याचा नसून कट्टर शिंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरे यांच्याकडून उमटला आहे. गोवा-गुवाहाटीच्या राजकीय घडामोडीनंतर पक्षाशी निष्ठा राखत, “शिवदूत”, “शासन आपल्या दारी”, “लाडकी बहीण” यांसारख्या योजनांपासून ते आरोग्य शिबिरे, वैद्यकीय मदत, अपंगांना बिल वाटप, धर्मवीर चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण अशी विविध कामे प्रामाणिकपणे राबविल्याचा दावा त्यांनी पत्रात केला आहे.
साताऱ्यासारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद उभी करण्यासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांनाच जर दुय्यम वागणूक मिळत असेल, तर “निष्ठा ठेवून काय उपयोग?” असा जाहीर सवाल मोरे यांनी उपस्थित केला आहे. “आमची निष्ठा शिंदे साहेबांशी अखेरच्या श्वासापर्यंत आहे, पण पदावर काम करण्याची इच्छा उरलेली नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा : महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल; खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल
मोरे यांनी स्वतःचे संपर्क कार्यालय जिल्हा संपर्क कार्यालय म्हणून चालवले, स्वतःसह कुटुंबालाही पूर्णवेळ पक्षकार्यात झोकून दिले, तरीही वरिष्ठांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. “कार्यकर्त्यांना जपण्याची ताकद नसेल, तर पक्षात राहण्याचा अर्थ नाही,” हा त्यांचा रोखठोक इशारा पक्ष नेतृत्वासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. दरम्यान, शहरातील अनेक बूथ प्रमुखांनीही पदाचे राजीनामे दिल्याने हा असंतोष वैयक्तिक न राहता संघटनात्मक बंडात परिवर्तित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरच उघडकीस आलेला हा अंतर्गत संघर्ष शिंदे गटासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.