
Ramdas Kafam
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाचे, यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडत जोरदार युक्तिवाद केला. आता शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद होणे बाकी आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे गटावर निशाणा साधला. पक्षाच्या मालकीबाबत वारसाहक्काचा मुद्दा लागू होत नसल्याचे त्यांनी म्हटले.
“वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही. वारसाहक्काने वडिलांची मालमत्ता मिळू शकते, मात्र पक्ष मिळत नसतो,” अशी भूमिका रामदास कदम यांनी मांडली. सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर अनेक बाबी अधिक स्पष्ट होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर ठाकरे गटातील काही नेते उत्साही झाले असून, निकाल आपल्या बाजूने लागेल अशी अपेक्षा व्यक्त करत असल्याबाबत कदमांना प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. “काही लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे असतात. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या. लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,” असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यावरही रामदास कदम यांनी भाष्य केले. राहुल गांधी ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमात सहभागी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी काँग्रेसच्या जुन्या ‘गरिबी हटाव’ घोषणेचा उल्लेख केला.
गरिबी हटावचा नारा दिल्यानंतर तळागाळातील जनतेसाठी काँग्रेसने नेमके काय केले, असा सवाल त्यांनी राहुल गांधींना केला. काँग्रेस सत्तेत असताना हिंदू-मुस्लिम समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काम झाल्याचा आरोपही कदम यांनी केला.
शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन कार्यक्रम केल्याने राजकीय यश मिळेल का, असा सवाल करत कदम यांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाला ‘बालिश प्रयत्न’ असे संबोधले. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षनाव आणि चिन्हाच्या कायदेशीर लढाईसोबतच राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरूनही राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.