'काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात'; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार
देशभरात सध्या राजकीय वातावरणात चांगलीच धामधूम पाहायला मिळत असून राज्यातदेखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना आता राज्यात मित्रपक्षांमध्येही जुंपली असल्याचे दिसत आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून (Delimitation) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात शाब्दिक संघर्ष पाहायला मिळत आहे.
माध्यमांशी संवाद साधत सुप्रिया सुळेंनी आज (शुक्रवार, 21 ऑगस्ट) पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मनुस्मृतीवादी विचारांच्या लोकांसोबत जाण्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
राज्यातील काँग्रेसचे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसला सातत्याने चुकीच्या राजकीय चौकटीत बसवतात, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. केंद्रातील काँग्रेस नेत्यांशी राष्ट्रवादीचा नियमित संवाद असल्याचे सांगत राज्य आणि दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाच्या संवादामध्ये काही प्रमाणात अंतर असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीची भूमिका वेगळ्या पद्धतीने दिसत असल्याचे सुळे यांच्या वक्तव्याचा सूर होता.
‘भाजपाने राहुल गांधींचा धसका घेतला’; पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर कन्हैया कुमारांचा दावा
शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मालकी आणि पक्षाच्या संविधानाचा मुद्दाही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगात अजित पवार गटाला यश मिळाले असले तरी सर्वोच्च न्यायालयातील लढाई अद्याप सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष काढणाऱ्या शरद पवारांकडून पक्ष काढून दुसऱ्याला देणे हा अन्याय असल्याचेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, बीडमधील विलास घुले प्रकरणाचा संदर्भ देत बजरंग सोनावणे यांच्या कुटुंबावर होणाऱ्या आरोपांवर सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. राजकीय संघर्ष घरापर्यंत नेऊ नये, तसेच खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल केले गेल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. बजरंग सोनावणे यांच्या पाठीशी शरद पवार आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याबाबतही सुप्रिया सुळे यांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकशाही मार्गाने कार्यक्रम घेत असताना त्यांच्या कार्यक्रमासाठी एवढ्या अटी का घातल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी केला.
याचदरम्यान, 2014 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. मात्र, त्यावेळी शिवसेनेसोबत जाण्यास काँग्रेस तयार नसल्याने प्रस्ताव फेटाळल्याचे त्यांनी सांगितले. 2019 मध्ये बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर महाविकास आघाडीचा मार्ग मोकळा झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर मविआतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेली वक्तव्यांची देवाणघेवाण आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.






