(Photo - X)
राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी होणाऱ्या महत्त्वपूर्ण भेटीची माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजता ही भेट होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्रासमोर सध्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर विकासाशी संबंधित अनेक प्रश्न आणि मतदारसंघातील विविध प्रलंबित मुद्दे खासदारांच्या माध्यमातून केंद्रासमोर मांडायचे आहेत. याच विषयांवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा केली जाणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आठ खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत होणारी भेट केवळ महाराष्ट्रातील प्रश्नांपुरती मर्यादित राहणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः आगामी मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे महत्त्वाने पाहिले जात आहे.
‘Gen Z शी बोलण्याआधी अमित शाहांचा राजीनामा घ्या’; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना खोचक टोला
लोकसभा आणि राज्यसभेत घटनादुरुस्तीशी संबंधित प्रस्तावांना आवश्यक बहुमत मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याची राजकीय चर्चा आहे. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास देशातील लोकसभा मतदारसंघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या लोकसभा मतदारसंघांच्या जागांचे वाटप 1971 च्या जनगणनेतील आकडेवारीच्या आधारे करण्यात आले आहे. त्यानंतरच्या काळात देशाची लोकसंख्या, राज्यांची लोकसंख्यात्मक रचना आणि सामाजिक परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे भविष्यातील मतदारसंघ पुनर्रचनेत नवीन जनगणनेची आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे.
पुनर्रचना प्रक्रिया झाल्यास नवीन आयोगाच्या माध्यमातून मतदारसंघांच्या सीमा निश्चित करणे आणि विविध राज्यांमधील लोकसभा जागांचे पुनर्वाटप करण्याची प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
अशा पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आठ खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत होणारी भेट आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. असे असले तरीही सुप्रिया सुळे यांनी मात्र हि भेट महाराष्ट्राच्या विकासकामांसाठी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.






