निलेश राणेंची वैभव नाईकांवर सडकून टिका
शिवसेनेतील फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निष्ठा, पक्षांतर आणि गद्दारीच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. आता आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते निलेश राणे यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. शिंदे गटात प्रवेश नाकारताना ‘गद्दारीचा कलंक लावून आमदारकी नको’ अशी भूमिका घेतल्याचा दावा वैभव नाईक यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर निलेश राणे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे जोरदार टीका केली.
वैभव नाईक यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सहभागी होण्यासाठी त्यांना अनेकदा संपर्क करण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीनंतरही भरत गोगवले यांनी आपल्याला फोन केल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, पक्ष बदलून मिळणारी आमदारकी नको असल्याने आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिलो, असा दावा नाईक यांनी केला.
यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांनी नाईकांच्या दाव्याची खिल्ली उडवली. आपल्या अधिकृत ‘X’ पोस्टवरून ते म्हणाले, “माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही” हा २०२६ चा सर्वात मोठा विनोद आहे. वैभव नाईक हरणारच होता म्हणून शेवटच्या क्षणाला इलेक्शन फॉर्म दिला नाही आणि त्यावर हा नीच आहे हे सगळ्यांना माहीत आहे. ज्या काँग्रेसने याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून हा दुसऱ्या पक्षात गेला, हा घंट्याचा निष्ठावान.”
“माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही” हा २०२६ चा सर्वात मोठा विनोद आहे. वैभव नाईक हरणारच होता म्हणून शेवटच्या क्षणाला इलेक्शन फॉर्म दिला नाही आणि त्यावर हा नीच आहे हे सगळ्यांना माहीत आहे.
ज्या काँग्रेसने याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून हा… — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 20, 2026
ते पुढे म्हणाले, “याला आता जिल्ह्यात कुत्र उभ करत नाही, हा ग्रामपंचायतीला पडेल याची अशी परिस्थिती झाली आहे, याचे दोन भाऊ माझ्यामुळे नगरसेवक झाले ते पण हा नमकहराम विसरला पण असो मी लहान लोकांच्या तोंडी लागत नाही, इथून पुढे काही बोलला तर माझे पदाधिकारी उत्तर देतील,” असे ते म्हणाले.
वैभव नाईक यांनीही निलेश राणेंवर यापूर्वी टीका केली होती. राणे आणि त्यांच्या वडिलांना शिवसेनेतून काढण्यात आल्याचा संदर्भ देत नाईक यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवर सवाल उपस्थित केले होते. आमदारकी मिळवण्यासाठीच राणेंनी भाजप सोडून शिंदे सेनेकडून निवडणूक लढवली, असा आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले, “निलेश राणेंनी आमदारकी मिळवण्यासाठीच भाजपला सोडचिट्ठी देऊन शिंदे सेनेतून निवडणूक लढवली. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे आणि यापुढेही राहील. निलेश राणे यांनी भाजपसोबत न जाता शिंदेसेनेसोबतच राहावे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, आगामी काळात या आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार येण्याची शक्यता आहे.






