
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यासंदर्भातील प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने फूट पडली, ती संविधानाच्या चौकटीत बसणारी नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने फूट पाडण्यात आली, ती योग्य नाही. या संपूर्ण प्रक्रियेबाबत विरोधकांनाही आणि आम्हालाही वस्तुस्थिती माहिती आहे. निवडणूक आयोगासारख्या संस्थेचा अशा प्रकारे वापर होणे लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले.
शिवसेनेच्या नेतृत्वावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि त्यांच्या हयातीत पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली, त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच असल्याचे त्या म्हणाल्या.
वेगळा राजकीय मार्ग स्वीकारायचा असेल तर राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष उभारल्याप्रमाणे तो मार्ग स्वीकारता आला असता, असेही सुळे यांनी नमूद केले. स्वतःच्या कर्तृत्वावर पक्ष उभा करणे ही कौतुकाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणाचाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी उल्लेख केला. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य असून पक्षाच्या घटनेतील तरतुदींनुसार केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येवर पक्षाचे मालकी हक्क ठरत नसल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच असल्याचे सांगत या संदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय केल्याचे जड अंतःकरणाने म्हणावे लागत आहे, अशी नाराजी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाच्या वादावर न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय निर्णय होतो, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.