
MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; 'ऑपरेशन टायगर' नसल्याचा सामंतांचा दावा
Operation Tiger : ऑपरेशन टायगर यशस्वी; सहा खासदारांच्या फोडाफोडीत फडणवीसांची शिष्टाई ठरली निर्णायक
उदय सामंत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दररोज मुंबईत पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे त्याला ‘ऑपरेशन टायगर’ म्हणायचे झाल्यास त्याला ३६५ पर्यंत क्रमांक द्यावा लागेल. महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींना जर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारायचे असेल, तर आम्ही त्यांना का नाकारावे? मात्र कोणतेही विशेष ऑपरेशन सुरू नाही.”
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत विचारले असता सामंत म्हणाले, “विजय वडेट्टीवार हे आमचे आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी पक्षप्रवेशाबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. मात्र विदर्भाशी घट्ट नाळ जोडलेला आणि लोकांमध्ये लोकप्रिय नेता आमच्यासोबत आला, तर त्याचा आनंदच होईल.”
संजय दिना पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत बोलताना सामंत म्हणाले की, त्यांच्या वक्तव्याचे पक्षाने कुठेही समर्थन केलेले नाही. त्यांनी त्याबद्दल माफी मागितली असून भविष्यात अशी भूमिका पुन्हा घेणार नाहीत, अशी चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत केली आहे. “त्यांच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो,” असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
अयोध्या राम मंदिरासाठी शिवसेनेने दिलेल्या चांदीच्या विटीबाबत संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, “या प्रकरणी उत्तर प्रदेशात एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. काही गैरप्रकार झाला असेल, तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. मात्र महाराष्ट्रातून या विषयावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.”
राज्यातील डेटा सेंटर उभारणीसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, २०२६ च्या ग्रीन डेटा सेंटर पॉलिसीमध्ये पाणी पुनर्वापरासह विविध पर्यावरणीय बाबींचा समावेश करण्यात आला आहे. एमएमआर परिसरातील डेटा सेंटरसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अमेझॉन आणि ब्लॅकस्टोनसारख्या कंपन्या हजारो कोटींची गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याची माहिती त्यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याबाबत विचारले असता, “त्यांना माझ्या शुभेच्छा,” असे सांगत सामंत यांनी अधिक भाष्य टाळले. दरम्यान, राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले असतानाच उदय सामंत यांनी कोणतेही ऑपरेशन नसल्याचा दावा करत महाविकास आघाडीतील इच्छुक नेत्यांसाठी शिवसेनेचे दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट केले आहे.