'ऑपरेशन टायगर'चे मास्टरमाइंड डॉ. श्रीकांत शिंदे? उबाठाला खिंडार पाडण्यात रणनीती ठरली निर्णायक
शिवसेनेकडून करण्यात येणाऱ्या दाव्यानुसार, उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नाराज खासदारांना शिवसेनेत आणण्यासाठी राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या रणनीतीमागे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची महत्त्वाची भूमिका होती. गेल्या वर्षभरात त्यांनी संसदीय आणि संघटनात्मक पातळीवर आवश्यक डावपेच आखून योग्य वेळी ही मोहीम यशस्वी केल्याचा दावा केला जात आहे.
पक्षाच्या मते, सर्वपक्षीय खासदारांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध, दिल्लीतील राजकीय वर्तुळात असलेली ओळख आणि संसदीय नियमांची जाण यामुळे हे ऑपरेशन शक्य झाले. शिवसेनेतील २०२२ मधील बंडानंतर ‘ऑपरेशन टायगर 2.0’ हा पक्षासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे सांगितले जात आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे हे उच्चशिक्षित, अभ्यासू आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कल्याण लोकसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांच्या नेतृत्वावर मतदारांनी वेळोवेळी विश्वास दाखवला आहे. सांसद म्हणून त्यांनी रेल्वे, मेट्रो, महामार्ग आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. राम मंदिर, कलम ३७० आणि वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेत शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे संख्याबळ वाढवण्यासाठी ‘बेरजेच्या राजकारणा’वर भर देण्यात आला. नाशिकचे अपक्ष आमदार गोकुळ गिते यांना विधान परिषदेतील सहयोगी सदस्य म्हणून जोडण्यात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला.
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर आउटरिच’ अंतर्गत सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. या शिष्टमंडळाने आफ्रिकेतील चार देशांचा दौरा केला. या दौऱ्यात विविध राजनैतिक बैठका, चर्चासत्रे आणि व्याख्यानांमधून त्यांचे नेतृत्वगुण अधोरेखित झाल्याचे सांगितले जाते.
संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यभर ‘शिवसंवाद’ आणि ‘जनसंवाद’ दौरे केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष संघटनेत नवे चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या म्हणण्यानुसार, ठाणे, कल्याण, पालघर आणि इतर भागांतील निवडणूक रणनीती आखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच राज्यातील १०३ विधानसभा मतदारसंघांत सभा आणि बैठका घेत पक्ष विस्तारासाठी काम केले. शिवसेनेकडून करण्यात येणाऱ्या या दाव्यांनुसार, डॉ. श्रीकांत शिंदे हे केवळ खासदार म्हणूनच नव्हे, तर संघटक, रणनीतीकार आणि युवा नेतृत्व म्हणूनही पक्षाच्या राजकारणातील महत्त्वाचे केंद्रबिंदू बनले आहेत.






