
Uddhav Thackeray, Maharashtra Politics, Ram Mandir,
Uddhav Thackeray Press conference : “भाजपचे सुरुवातीला दोनच खासदार होते. पण राममंदिराच्या मुद्द्याचे भांडवल करून भाजपवाले हिंदुत्त्वाकडे आले. आज ते देशात सत्ता उपभोगत आहेत. भाजपवाले आता ऑपरेशन राम मंदिर करत आहे का? राममंदिरालाच मिळालेल्या दानाची चोरी करून चोरीचा पैसा ते पक्ष फोडण्यासाठी वापरत आहेत. राम मंदिरावर दरोडा टाकला जातोय.” असा आरोप करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे.
येत्या रविवारी (5 जुलै) दादर येथील हनुमान मंदिरासमोर दुपारी चार वाजता हे आंदोलन होणार आहे. राम मंदिर आणि रामावर प्रेम कऱणाऱ्या राम भक्तांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दादरमधील हनुमान मंदिरांसमोर दुपारी चार वाजता रामरक्षा स्त्रोत्र आंदोनल करणार, तमाम हिंदू आणि रामभक्तांना या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करत आहे. हनुमान चालीसा, मारुती स्त्रोत्र देखील म्हणणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ” आज संपूर्ण देश भाजपच्या अंमलाखाली आहे. भाजपचे मूळ ज्यात आम्ही देखील सहभागी होतो, ते मुळ म्हणजे राम मंदिर. राम मंदिरासाठी जे आंदोलन झाले त्यात अनेक शिवसैनिक देखील सामील झाले होते. त्यात अनेक हिंदू आणि रामभक्तही होते. पण त्यानंतर झालेले कारसेवकांवर झालेले अत्याचार, गोधरा कांड, अहमदाबाद दंगल, मुंबईत झालेले बॉम्बस्फोट. या सगळ्या घटनांमध्ये हिंदूनी खूप काही सोसलं होतं.
या सगळ्या घडामोडींपूर्वी भाजपचे देशात केवळ दोनच खासदार होते. भाजपने त्यांची मूळ विचारसरणी सोडून हिंदुत्त्वाकडे वळले आणि राम मंदिराच्या मुद्द्याचे भांडवलं करून ते आज देशात अमर्याद सत्ता भोगत आहेत. पण आता राम मंदिरातील दान चोरीचा मुद्दा चर्चिला जात आहे,हे दुर्दैव आहे.आज जी दरोडेखोरी चालली आहे. आमदार-खासदार फोडले जात आहेत, खरेदी विक्री केली जात आहे. त्याला ऑपरेशनचे नाव दिले जात आहे. पण भाजपकडून ऑपरेशन राम मंदिर सुरू आहे का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
याच्या बातम्या दाखवल्या जात असतील किंवा नसतीलही पण मंदिरातील दानाची चोरी तर नक्कीच सुरू आहे. मंदिरावर दरोडा टाकला गेला आहे, त्याचे पुरावेदेखील दिले जात आहे. पण हा चोरीचा पैसाच पक्ष आणि आमदार खासदार फोडण्यासाठी वापरला जात आहे, हे फार गंभीर आहे.
राम मंदिर चोरीला आता हिंदू माफ करणार नाही. जे मंदिर लुटत आहेत, ते भाजपचे असोत किंवा इतर कोणी असोत त्यांना हिंदू कदापि माफ करणार नाहीत. मंदिर होण्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं त्यांच रक्त वाया जाऊ देणार नाही. हिंदूंच्या भवनांशी खेळणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. याची सुरूवात आम्ही करत आहोत. दादर येथील हनुमान मंदिरासमोर तमाम हिंदुना आम्ही आमंत्रित करत आहोत. तिथे पक्षाचा विचार न करता आणि तमाम हिंदू आणि राम भक्तांना, भाजपच्या कालखंडात हिंदुत्तवच धोक्यात आले आहे, यासाठी ज्यांनी मोर्चे काढले होते. अशा सर्वांना आम्ही आमंत्रित करत आहोत.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.