
'भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी'; परभणीत उद्धव ठाकरे यांचा घणाघात, फडणवीस-गडकरींवरही निशाणा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी येथे आयोजित जाहीर सभेत भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. बंडखोर खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघातील या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर हिंदुत्व, राम मंदिर आणि सत्तेच्या राजकारणावरून निशाणा साधला.
शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या या सहा खासदारांच्या मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे हे मेळावे घेत असून स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज (रविवार, 28 जून) परभणी येथे आयोजित जाजोदिर सभेत त्यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर कडाडून टीका केली.
यावेळी, राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्हाला मंदिर बांधायचं नव्हतं, रामाच्या नावाने लूट करायची होती. जगातील तमाम हिंदूंशी गद्दारी झाली आहे. भाजप नव्हे, ही बाबर जनता पार्टी आहे. बाबरांनी मंदिर पाडलं, हे मंदिर लुटत आहेत.” तसेच बंडखोर खासदारांनी अशा पक्षाला पाठिंबा का दिला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बंडखोर खासदारांच्या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसमोर आत्मपरीक्षणही केले. “तुम्ही त्यांना निवडून दिलं, माझीही चूक झाली. एवढी वर्षे सोबत राहिल्यावर विश्वास ठेवायचा नाही का? मी माफी मागतो,” असे म्हणत त्यांनी शिवसैनिकांना गद्दारांविरोधात एकजूट राहण्याचे आवाहन केले.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबतही मोठा दावा केला. त्यांच्या मते, भाजपमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येणाऱ्या नेत्यांचे राजकीय पंख छाटले जातात.
ते म्हणाले, “शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत जे झालं, तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही सुरू आहे. त्यांच्या राजकीय पंख कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नुकत्याच विमानातील भेटीत ते हतबल वाटत होते.”
नितीन गडकरी यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “गडकरी पक्षाध्यक्ष होते. पुन्हा अध्यक्ष झाले असते तर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आले असते. म्हणून त्यांचेही पंख छाटण्यात आले. आता त्यांची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न झाला.”