
'मी भेटत नव्हतो तर गधड्या तू निवडून कसा आला?'; ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरेंचा पलटवार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापनदिन मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत ठाकरे यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले.
ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे प्रचारासाठी फिरत नसल्याची टीका केली होती. “उद्धव ठाकरे प्रकृतीमुळे प्रचारासाठी येत नाहीत, पण निदान आदित्य ठाकरे तरी मतदारसंघात फिरायला हवेत,” असे निंबाळकर यांनी म्हटले होते. याच वक्तव्याचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी वर्धापनदिन मेळाव्यातून त्यांना प्रत्युत्तर दिले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “उद्धव ठाकरे भेटत नाहीत, आदित्य फिरत नाहीत असं म्हणतात. मी भेटत नव्हतो तर गधड्या तू निवडून कसा आला? प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मी सहा ते दहा सभा घेतल्या, तेव्हा तुम्ही निवडून आलात.” ते पुढे म्हणाले, “मी मंत्री केलं, आमदार केलं, खुर्ची दाखवली. हा माझा गर्व असेल, पण मी तो गर्व दाखवणार नाही.”
बंडखोर खासदारांवर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, काहींना वाटतं लोकांनी त्यांना वैयक्तिक मत दिलं. “उद्धव ठाकरेंना किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेंना किंमत आहे,” असे ते म्हणाले.
आपली भूमिका स्पष्ट करताना ठाकरे यांनी वडाच्या झाडाचे उदाहरण दिले. “वड मोठा असतो. एखादा लांबून नमस्कार करतो. पारंबीला वाटतं नमस्कार मलाच केला. पण तो पारंबीला नाही, तर खोडाला केलेला असतो,” असे म्हणत त्यांनी बंडखोर खासदारांवर अप्रत्यक्ष टीका केली.
ठाकरे यांनी बंडखोरांवर भावनिक शब्दांतही हल्ला चढवला. “मातोश्रीवर शिंतोडे उडवले जात आहेत. ही कोणती अवलाद आहे? शिवसेनाप्रमुखांनी स्वाभिमान पेरला, मग ही भेसळ कुठून आली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडानंतर आयोजित झालेल्या या पहिल्याच मोठ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. बंडखोर खासदार, भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका करत त्यांनी शिवसैनिकांना एकजूट राहण्याचे आवाहन केले. वर्धापनदिनाच्या व्यासपीठावरून दिलेल्या या भाषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.