
२०२९ पर्यंत ठाकरेंकडे एकही आमदार नसेल
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक नेतेमंडळी बाहेर पडताना दिसत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर शिवसेना शिंदे गटाच्या वर्धापन दिन मेळाव्यात जोरदार टीका करत पक्षातील आणखी मोठ्या फुटीचे संकेत दिले आहेत. मुंबईतील २५ माजी नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करताना २०२९ पर्यंत एकही आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिल्लक राहणार नसल्याचा दावा कदम यांनी केला.
रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, संजय राऊतांना आम्ही गांभिर्याने घेत नाही. तुम्ही ‘ऑपरेशन तुडवा’ असे म्हणाले, पण आम्ही शिवसैनिक आहोत, आमच्या अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी संजय राऊतांना दिला. तुडवायची भाषा कुणाला करताय, हिंमत असेल तर खासदारांच्या केसाला धक्का लावून पाहा. तुमच्या घरात शिवसैनिक शिरतील आणि तोंड बंद करतील, फोडून काढतील, असेही रामदास कदम म्हणाले. राऊत तुमचे तोंड सांभाळा, असे कदम म्हणाले.
दरम्यान, रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आता स्वतः मातोश्रीच्या बाहेर पडून वास्तव पाहावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खूप पुढे गेले असून, भविष्यात ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे नेतृत्व म्हणून उदयास येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे होते म्हणून शिवसेना वाचली
शिवसेनेतील बंडानंतर पक्षाचे जे अस्तित्व टिकून राहिले, ते केवळ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळेच, असा दावा करत कदम म्हणाले की, एकनाथ शिंदे होते म्हणून शिवसेना वाचली. त्याचा आम्हाला अभिमान आहे. उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही. केवळ आदित्य ठाकरे यांच्यासाठी तुम्ही पक्षाची वाट लावली.
आमच्या काळजावर घाव झालाय : सुषमा अंधारे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात भावूक होत भाष्य केले. ठाकरे गटातील काही खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चावर (ऑपरेशन टायगर) प्रतिक्रिया देताना’ आमच्या काळजावर घाव झाला’, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ओमराजे निंबाळकर हलणार नाहीत असं वाटत होते, ते असे करू शकतात यावर विश्वास बसत नाही, असे म्हणत त्यांनी आश्चर्य व नाराजी व्यक्त केली.