
Varsha Gaikwad, Maharashtra Government, disqualification of beneficiaries in Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana,
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजनेवरून चर्चा सुरु आहेत. राज्य सरकारने राज्यातील ८० लाख महिला या योजनेस अपात्र असल्याचे ठरवत त्यांचे नाव योजनेतून काढून टाकले आहे. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार विरोध दर्शवत सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. यावरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरॊप त्यांनी केले असून त्यांच्या या आरोपांनी आता राज्यात खळबळ उडाली आहे.
राज्यात मोठ्या गाजावाजासह सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या गेमचेंजर ठरली होती. मात्र आता या योजनेतील तब्बल ८१ लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत. बँक पडताळणी, ई-केवायसी मोहीम आणि कौटुंबिक उत्पन्नाच्या माहितीची काटेकोर छाननी केल्यानंतर महिला व बालविकास विभागाने ही मोठी कपात केली आहे. या धडक कारवाईमुळे सुरुवातीला मोठ्या संख्येने लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विरोधकांनी देखील राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
खासदार वर्षा गायकवाड यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्या यावेळी म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार? मुख्यमंत्री महोदय, लाडकी बहीण योजनेतून आज ८० लाख महिला अपात्र होत असतील तर, त्याला जबाबदार असलेल्या यंत्रणेवर आणि यामाध्यमातून राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे! अन्यथा ही योजना म्हणजे निवडणुकीपूर्वी वाटलेली लाच म्हणावी लागेल.”
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार? मुख्यमंत्री महोदय, लाडकी बहीण योजनेतून आज ८० लाख महिला अपात्र होत असतील तर, त्याला जबाबदार असलेल्या यंत्रणेवर आणि यामाध्यमातून राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे! अन्यथा ही योजना म्हणजे… pic.twitter.com/wd5bK1ALhO — Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 2, 2026
त्या पुढे म्हणाल्या, “सरकारने गेल्या २० महिन्यांत ८० लाख अपात्र महिलांना १५०० रुपये दिले. या हिशोबाने २४ हजार कोटी रुपये वाटलेत, हा मोठा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे ही योजना राबवताना अर्जांची पडताळणी करणारे अधिकारी, कर्मचारी कोण होते? त्यांच्यावर कारवाई कधी करणार? निकषात बसत नसताना लाखो लाभार्थ्यांना महिनोनमहिने लाभ कसा दिला गेला? ही सरकारी तिजोरीची लूट नाही का? सरकारी निष्काळजीपणा, ढिसाळ नियोजन आणि राजकीय फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा आर्थिक बोजा महाराष्ट्राच्या जनतेने का उचलावा? या २४ हजार कोटींचा हिशोब महायुती सरकारला द्यावाच लागेल!”
लाडकी बहीण योजनेतून तब्बल १.२५ कोटीहून अधिक महिलांना अपात्र, सुप्रिया सुळेंचा खळबळजनक दावा
८१ लाख महिला अपात्र ठरल्याचे वृत्त समजताच महिला वर्गामध्ये याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. बँक खाती आणि आधार लिंक असूनही तांत्रिक त्रुटींमुळे नाव बाद झाल्याचा आरोप अनेक महिला करत आहेत. “निवडणुका संपल्यानंतर सरकारने नियमांचा जाच वाढवून हक्काचे पैसे नाकारले आहेत,” अशी भावना काही संतप्त महिलांनी ‘महिला चौपाल’मध्ये बोलताना व्यक्त केली. ऐन महागाईच्या काळात महिनाभराचा हातभार लावणाऱ्या या योजनेतून अचानक नाव वगळले गेल्याने महिला वर्गात मोठी चिंतेची आणि नाराजीची लाट आहे.
मोठी बातमी ! शेतकरी कर्जमाफीवर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब, ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार फायदा