
महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला, पण चौकशी त्याचीच? महापौर रितू तावडेंच्या आदेशावर वर्षा गायकवाडांचा संताप
मुंबईतील पहिल्याच पावसात अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याने महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे गांधी मार्केट परिसरात पाहणीसाठी गेल्या असताना महापालिका कर्मचारी उघड्या ड्रेनमध्ये पडल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठली.
या घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी ही बाब संशयास्पद वाटत असल्याचे सांगत सखोल चौकशीचे आदेश दिले. कर्मचारी नेमका कशामुळे पडला, ड्रेन उघडा का होता आणि सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
महापौरांच्या आदेशानंतर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया दिली. “महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला, पण आता त्याचीच चौकशी होणार आहे. मग पावसाचीही चौकशी करा,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
‘गँगस्टरही अशी भाषा बोलणार नाही, असं खासदार बोलतोय’; राज ठाकरे यांचा संजय दिना पाटलांवर निशाणा
त्या म्हणाल्या की, “मुंबईच्या महापौर तावडे यांनी आता पावसाची पण चौकशी लावावी! पहिल्या पावसात मुंबईत पाणी तुंबल्यावर महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला… पण आता त्याची चौकशी होणार आहे.. महापौर रितू तावडे पाहणी करताना महापालिकेचा कर्मचारी मुद्दाम गटारात पडला का? अशी चौकशी होणार आहे.. चौकशी करताना कर्मचाऱ्याला विचारा गटारात पडण्यापूर्वी परवानगी घेतली होती का? पडताना नियमांचे पालन केले का? गटाराची बदनामी करायची होती की पावसाची?”
मुंबईच्या महापौर तावडे यांनी आता पावसाची पण चौकशी लावावी! पहिल्या पावसात मुंबईत पाणी तुंबल्यावर महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला… पण आता त्याची चौकशी होणार आहे.. महापौर रितू तावडे पाहणी करताना महापालिकेचा कर्मचारी मुद्दाम गटारात पडला का? अशी चौकशी होणार आहे..
चौकशी करताना… pic.twitter.com/drDDU5ebQm — Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 26, 2026
“आमची तर मागणी आहे महापौर यांची बदनामी पावसाला करायची होती त्यामुळे पुढे जाऊन पावसाची चौकशी करा…पावसाची हिंमत झालीच कशी,तो पडला का? तो पडल्यामुळे मुंबईत पाणी तुंबले आणि त्यामुळे महापौर मॅडमना काम करावे लागले.. त्यामुळे महापालिकेने फक्त कर्मचाऱ्याची नाहीतर पावसाची पण चौकशी करावी!”
MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा
वर्षा गायकवाड यांनी महापालिका प्रशासनावर असंवेदनशीलतेचा आरोप करत, “पावसात कर्मचारी गटारात पडला, ही वेळ का आली? मुंबईत अजून कुठे गटार उघडी आहे का? सुरक्षा उपाय काय आहेत? याची चौकशी करण्याऐवजी कर्मचाऱ्याच्या हेतूवर संशय घेणे म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे! धन्य त्या महापौर, धन्य ते मुंबई महापालिका प्रशासन!” असे त्या यावेळी म्हणाल्या.
या प्रकरणामुळे मुंबईतील पावसाळी तयारी, नालेसफाई आणि उघड्या मॅनहोलच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.