वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची अर्थसंकल्प 2025 वर जोरदार टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर हे पहिलेच बजेट असल्यामुळे अनेकांनी अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. काल २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पामध्ये १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचे जाहीर केले आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. “हा अर्थसंकल्प विशेषतः १२ लाखांच्या उत्पन्न करात सवलत, चिंताग्रस्त मध्यमवर्गासाठी एक आर्थिक लॉलीपॉप आहे”, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन बजेटवरुन भाजपवर निशाणा साधला. प्रकाश आंबेडकर यांनी लिहिले की, “2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प विशेषतः 12 लाख रुपयांच्या उत्पन्न करात सवलत, हे चिंताग्रस्त मध्यमवर्गासाठी एक आर्थिक लॉलीपॉप आहे! २०२२-२३ मध्ये, फक्त २.२४ कोटी भारतीय किंवा मध्यमवर्गातील सर्वसामान्यांनी उत्पन्न कर भरले. मध्यमवर्गातील सर्वात खालचा वर्ग आयकर भरत नाही. मग आयकर सवलतीचा बहुसंख्य मध्यमवर्गीयांना कसा फायदा होईल, जे आयकरच भरत नाहीत? हे लोक उपभोगावर जीएसटीच्या स्वरूपात कर भरतात.” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रकाश आंबेडकर आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणाले, “दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कर सवलतीचे अर्थमंत्र्यांचे मोठे दावे बहुसंख्य मध्यमवर्गीयांना मदत करणार नाहीत आणि त्यांच्या खरेदी क्षमतेतही वाढ होणार नाही. तसेच, अर्थमंत्र्यांनी या बहुसंख्य लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. उत्पन्न आणि खरेदी क्षमतेत कोणतीही वाढ न झाल्याने, हे बहुसंख्य लोक पूर्वीपेक्षा जास्त ओझे झाले आहेत.” असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.
The #UnionBudget2025, especially the ₹12 lakh income tax rebate, is an economic lollipop to the anxious middle-class!
In 2022-23, only 2.24 crore Indians or the cream of the middle class paid income taxes. The bottom of the middle class does not pay income tax. How will the…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 2, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे आंबेडकर म्हणाले की, “यामुळे कर सवलत, वाढलेली क्रयशक्ती आणि वाढता वापर याभोवतीचा गोंधळ केवळ एक विनोद बनतो कारण त्यामुळे बहुसंख्य लोक वंचित राहतील. पंतप्रधानांनी दिलेला उपाय हा वृत्तपत्रांसाठी एक चांगला मथळा आणि मध्यमवर्गासाठी एक तुष्टीकरण, एक लॉलीपॉप आहे!”, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.
नाना पटोलेंची जोरदार टीका
अर्थसंकल्पावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, “आज देशातील शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी होत असताना भाजपा सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नाही. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये केल्याने शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे.रोजगार निर्मितीबद्दल काहीच ठोस नियोजन दिसत नाही. आयकरात १२ लाख रुपयांपर्यत कर नाही अशी घोषणा केली आहे पण त्यातही गोंधळ आहे. नोकरदार व मध्यमवर्गिंयाना फायदा द्यावा यासाठी आयकर मर्यादा वाढवण्यामागे लोकसभेला ४०० पारचा रथ थोपवून २४० वर थांबवल्याने ही घोषणा करावी लागल्याचे दिसत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.