
MLC Election, MahaYuti, Maharashtra Politics, Eknath Shinde,
महत्त्वाची बाब म्हणजे विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीलाच (भाजप) सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा) विद्यमान नगरसेवकांच्या संख्याबळाचा विचार करता भाजपचा या निवडणुकांमध्ये स्पष्ट वरचष्मा आहे. प्राथमिक माहितीनुसार, १७ जागांपैकी भाजप १२, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर लढण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. मात्र, शिवसेनेने अधिक जागांवर दावा केल्याने महायुतीतील समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘नंदनवन’ येथे भेट घेतली. या बैठकीत जागावाटप, सध्याचे संख्याबळ आणि विद्यमान सदस्यांना पुन्हा संधी देण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी महायुती सर्व १७ जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महायुती संदर्भातील निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. जवळपास ९९ टक्के मुद्द्यांवर एकमत झाले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अंतिम चर्चा करून उर्वरित एक-दोन मुद्द्यांवर निर्णय घेतील. सध्या ज्या पक्षाकडे जागा आहे, त्या पक्षालाच ती जागा देण्याचा प्राथमिक फॉर्म्युला आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाचा विचार केला जाईल. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही हाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता.”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण जागांपैकी महायुतीमध्ये प्राथमिक स्तरावर खालील सूत्रावर चर्चा झाल्याची माहिती आहे. यात भाजपला १२ जागा, शिवसेना शिंदे गटाला ३ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ जागांसाठी चर्चा झाली.
या निवडणुका स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांमधून होणार आहेत, जिथे प्रामुख्याने महानगरपालिका आणि नगरपालिकांचे सदस्य मतदान करतात. अलीकडेच पार पडलेल्या राज्यातील २९ महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने तब्बल १,४२५ जागा जिंकून एकहाती मोठा विजय मिळवला आहे. याउलट शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे संख्याबळ भाजपच्या तुलनेत बरेच मर्यादित आहे. त्यामुळे ज्या पक्षाचे जितके संख्याबळ, त्यानुसार जागावाटपाचा हा नैसर्गिक फॉर्म्युला ठरवण्यात येत आहे.
हा जरी प्राथमिक फॉर्म्युला समोर आला असला, तरी काही विशिष्ट जागांवरून महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये अद्याप अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे.
पुणे आणि कोकणची जागा: पुणे आणि कोकण या जागांवर पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर आता स्थानिक पातळीवरं गणिते फार बदलली आहेत. त्यामुळे आता भाजपनेही पुण्याच्या जागेवर दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे, कोकणच्या जागेसाठी (रायगड-रत्नागिरी-
सिंधुदुर्ग) अजित पवार गटाचे तटकरे आणि शिंदे गटाचे नेते आमनेसामने आले आहेत.
ठाणे आणि नाशिक: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला आहे. तरीही ठाण्यात भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या जागा आपल्याकडेच राहाव्यात यासाठी दोन्ही पक्षांकडून दबाव टाकला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर: शिंदे गट आपली पारंपरिक जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे संकेत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिले आहेत.