
फोटो सौजन्य- pinterest
वसंत म्हणजे निसर्गाचा उत्सवी आनंदसोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण, उत्सव साजरे करण्यासाठी निमित्तच शोधत असतो म्हणा ना! या काळात येणार्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत! वसंत म्हणजे शिशिरातील पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा – त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा ऋतू. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रती-मदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. असा हा ऋतुराज वसंत आला आहे, तर हा निसर्गाचा सर्जनसोहळा आपणही मनात साठवू या आणि तितक्याच उत्साहाने साजराही करू या.
ही सगळी किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत! वसंत म्हणजे शिशिरातील पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा – त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा ऋतू, म्हणूनच तो सर्वकालीन सर्वप्रिय असावा. भारतासारख्या अतिविशाल देशात, नैसर्गिक वैविध्यामुळे, निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ-फाल्गुन, काही ठिकाणी फाल्गुन-चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र-वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असे असले, तरीही सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसांनंतर, माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. वसंत पंचमी म्हणजेच माघ शुद्ध पंचमीपासून वसंतोत्सव सुरू होतो, याला मान्यता असल्याचे दिसते.
यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव! अर्थात, या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची-विद्यांची देवी सरस्वती या देवतांचे महत्त्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वतीसुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असे मानतात. याच दिवसाला श्री पंचमी असेही म्हटले जाते, कारण श्री लक्ष्मीसुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंतोत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा केला जात असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र या ग्रंथातही येतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्टी करतात. नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी देवतांना वाहतात. देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळे वगैरे खाणे सुरू करतात. अर्थात नवान्नेष्टीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणार्या पिकांप्रमाणे व त्यांच्या उपलब्धीच्या वेळेप्रमाणे बदलतो.
अगदी प्राचीन काळापासून कविमनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणार्या या वसंताची मोहक वर्णने अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यातही दिसतात. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मणग्रंथात तर या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुले, फळे येतात असे उल्लेख आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, “सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे (ऋतूनां कुसुमाकर:)” आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम तर सर्वांना माहीत आहेच. कालिदासाच्या जवळजवळ सर्वच रचनांमध्ये वसंतातील निसर्गाची उधळण आणि वसंत व कामदेव या जोडगोळीने प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव या सर्व गोष्टींची वर्णने मोठ्या प्रमाणात येतात. विशेषत: रघुवंशमध्ये व कुमारसंभवात वसंतामुळे बदलेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरीत वर्णन सापडते.
याखेरीज याच काळाच्या थोडे आधी, नंतर होणारे उत्सव म्हणजे होलिकोत्सव वा होळी, फाल्गुनोत्सव, कुसुमायुध महोत्सव, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे उत्सव! वसंतोत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो, त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फागुन तो हाच. प्रांत व कालगणनेनुसार निरनिराळी नावे व दिवस असले, तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच असलेले दिसते. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखलसुद्धा एकमेकांवर उडवणे, पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करणे, मोठमोठ्या आवाजात बोलणे, एकमेकांना चिडवणे, गाणी म्हणणे, मिरवणुका काढणे अशा अनेक क्रीडांची वर्णने साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहे. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण व गोपी यांचे नाते खूप जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णने सर्वांच्याच परिचयाची! कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महा-रास आयोजित करीत असत.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: भारतीय ऋतूचक्रातील सहा ऋतूंमधील एक महत्त्वाचा ऋतू म्हणजे वसंत. शिशिरानंतर येणारा हा ऋतू निसर्गात नवपालवी, फुलांचा बहर आणि चैतन्य घेऊन येतो. त्यामुळेच वसंताला ‘ऋतुराज’ असे म्हटले जाते.
Ans: सर्वसाधारणपणे माघ शुद्ध पंचमी (वसंत पंचमी) पासून वसंतोत्सवाची सुरुवात होते आणि फाल्गुन पौर्णिमेला (होळी) तो उत्साहात संपतो. प्रदेशानुसार कालावधीत थोडाफार फरक आढळतो.
Ans: या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. तसेच काही परंपरांनुसार कामदेव (मदन) यांचा जन्मदिवस मानला जातो. ज्ञान, कला आणि प्रेम यांचा संगम दर्शवणारा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.