
ऑगस्ट क्रांती दिन: आंदोलन, चळवळीने घडला संघर्षाचा इतिहास! 'करो या मरो'च्या नाऱ्याने पेटली जनतेच्या मनात स्वातंत्र्याची मशाल
स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास लिहिताना अमरावतीचे नाव केवळ एका शहरापुरते मर्यादित राहत नाही. या भूमीने ब्रिटिश सत्तेविरोधातील जनआंदोलनाला विचार, नेतृत्व आणि संघर्षाची ताकद दिली. विदर्भाच्या मातीत रुजलेली राष्ट्रीय चेतना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, दादासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी आणि आर. बी. मुधोळकर यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या कार्यातून अधिक प्रखर झाली. त्यामुळेच १९४२ च्या ऑगस्ट क्रांतीचा हुंकार अमरावतीच्या गल्लीपासून ग्रामीण भागापर्यंत घुमला आणि ‘करो या मरो’च्या नाऱ्याने जनतेच्या मनातील स्वातंत्र्याची ज्योत अधिक तेजस्वी झाली.(फोटो सौजन्य – AI)
स्वातंत्र्य आंदोलनाला व्यापक स्वरूप येण्याच्या आधीपासूनच अमरावतीत राजकीय आणि सामाजिक जागृतीची पायाभरणी झाली होती. खापर्डे, जोशी आणि मुधोलकर यांनी जनतेला संघटित करीत राष्ट्रीय विचार सामान्यांपर्यंत पोहोचविले. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या अमरावती व विदर्भ दौऱ्यांनी या वातावरणाला आणखी बळ दिले. सभा, भाषणे, सामाजिक उपक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून स्वराज्याची संकल्पना सामान्यांच्या मनात रुजत गेली.
८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात भारत छोडो आंदोलनाचा ठराव मंजूर झाला. महात्मा गांधींनी दिलेला ‘करो या मरो’चा नारा दुसऱ्याच दिवसापासून देशभर घुमू लागला. अमरावतीही या ज्वालामुखीपासून अलिप्त राहिली नाही. ब्रिटिश सत्तेविरोधात सभा, निदर्शने आणि जनजागृतीची आंदोलने सुरू झाली.
अमरावतीचा स्वातंत्र्यसंग्रामाशी अत्यंत जुना आणि गौरवशाली संबंध आहे. २६ एप्रिल १९३० रोजी वीर वामनराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली येथे ऐतिहासिक मिठाचा सत्याग्रह झाला. या आंदोलनात सुमारे १० हजार नागरिक सहभागी झाल्याचे सांगितले जाते. मुंबईहून आणलेल्या समुद्राच्या पाण्यासह दहीहांडा येथील पाण्यापासून मीठ तयार करून ब्रिटिशांच्या मिठाच्या कायद्याला खुले आव्हान देण्यात आले.
स्वातंत्र्यलढा केवळ राजकीय नेत्यांच्या सभा आणि आंदोलनांपुरता मर्यादित नव्हता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसह जनकवी, संत आणि समाजजागृती करणाऱ्या व्यक्तींनी भजन, कीर्तन आणि गीतांच्या माध्यमातून राष्ट्रीय चेतना जागवली. सोप्या भाषेतील गीतांमधून स्वातंत्र्याचा संदेश ग्रामीण भागातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचला. भक्तीच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची भावना जागविणाऱ्या या जनजागृतीने स्वातंत्र्य चळवळीला सामाजिक आधार मिळवून दिला.
अमरावतीतील राजकीय जागृतीची मुळे याहीपेक्षा जुनी आहेत. २७ ते २९ डिसेंबर १८९७ या कालावधीत येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे १३वे अधिवेशन झाले होते. दादासाहेब खापर्डे, रंगनाथ पंत मुधोळकर आणि वीर वामनराव जोशी यांसारख्या नेत्यांनी राष्ट्रीय चळवळीला बळ दिले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांच्या दौऱ्यांमुळे अमरावतीच्या जनतेतील स्वातंत्र्याची भावना आणखी प्रबळ झाली.