
प्रेमाच्या ताकदीने काय साध्य होऊ शकते? याचे जगातील सर्वात ज्वलंत आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणजे बिहारच्या गहालोर गावचे दशरथ मांझी, ज्यांना जग आज ‘माउंटेन मॅन’ या नावाने ओळखते. केवळ एका हातोड्याच्या आणि छिन्नीच्या बळावर एका अखंड डोंगराची छाती फाडून रस्ता तयार करणाऱ्या या माणसाची जिद्द मानवी इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिली गेली आहे.
दुःखातून जन्मलेली क्रांती
दशरथ मांझी हे अत्यंत गरीब कुटुंबातील होते. गहालोर हे गाव डोंगराच्या कडेला वसलेले असल्याने गावात वीज, पाणी किंवा वैद्यकीय सुविधा नव्हती. सर्वात मोठी अडचण म्हणजे गावातील लोकांना रुग्णालयात किंवा शहरात जाण्यासाठी संपूर्ण डोंगराला वळसा घालून ५५ किलोमीटरचा प्रवास करावा लागत असे.
Skanda Purana: स्कंद पुराणात भगवान शिवांचे महात्म्य कसे वर्णिले आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
१९५९ मध्ये एक दुर्दैवी घटना घडली. दशरथ मांझी यांच्या पत्नी फागुनी देवी डोंगरावरून पाय घसरून पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या. डोंगराच्या अडसरामुळे त्यांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवता आले नाही आणि उपचारांअभावी त्यांचा मृत्यू झाला. या दुःखाने मांझी पूर्णपणे खचले, पण त्याच दुःखाचे रूपांतर त्यांनी एका दृढ संकल्पात केले- “गावातून डोंगराचा अडसर कायमचा मिटवायचा!”
२२ वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष (१९६० ते १९८२)
लोकांनी त्यांना ‘वेडा’ म्हटले, पण मांझी आपल्या ध्येयापासून हलले नाहीत. त्यांनी कोणाचीही वाट न पाहता एक हातोडा आणि छिन्नी हातात घेतली व डोंगरावर घाव घालण्यास सुरुवात केली. त्यांनी ३६० फूट लांब, ३० फूट रुंद आणि २५ फूट खोल असा रस्ता एकट्याने डोंगरामधून कोरून काढला. सलग २२ वर्षे अहोरात्र मेहनत करून त्यांनी गहालोर ते वझिरगंज या दोन शहरांमधील अंतर ५५ किलोमीटरवरून थेट १५ किलोमीटरवर आणले.
अमर वारसा
२००७ मध्ये कर्करोगाने त्यांचे निधन झाले. बिहार सरकारने त्यांना शासकीय इतमामात निरोप दिला. त्यांच्या या अद्भूत प्रवासावर ‘मांझी – द माउंटेन मॅन’ हा हिंदी चित्रपटही बनवला गेला. दशरथ मांझी यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की, जेव्हा माणसाची इच्छाशक्ती मजबूत असते, तेव्हा डोंगरासारखी मोठी संकटेही त्याच्यासमोर नतमस्तक होतात.