फोटो सौजन्य- pinterest
उत्तर प्रदेशातील प्राचीन आणि सांस्कृतिक शहर असलेल्या वाराणसी (काशी) मध्ये अनेक प्रेक्षणीय आणि धार्मिक घाट आहेत. परंतु, या सर्व घाटांमध्ये ‘मणिकर्णिका घाट’ हा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि रहस्यमयी मानला जातो. हा केवळ एक घाट नसून हिंदू धर्मातील सर्वात मोठे आणि पवित्र ‘महास्मशान’ आहे.
‘मणिकर्णिका’ या नावामागे हिंदू पुराणांमध्ये अत्यंत रंजक कथा आढळतात. एका कथेनुसार, भगवान विष्णूंनी अनेक वर्षे तपश्चर्या करून येथे एक कुंड (तलाव) तयार केला होता. ज्यावेळी भगवान शिव आणि माता पार्वती या कुंडाजवळ आले, तेव्हा भगवान शिवाच्या आनंदाश्रूंनी ते कुंड भरले. त्याच वेळी माता पार्वतीच्या कानातील एक दागिना म्हणजेच ‘मणी’ (मणिकर्णिका) या कुंडात पडला. तेव्हापासून या स्थानाला ‘मणिकर्णिका’ असे नाव पडले.
हिंदू धर्मात अशी ठाम श्रद्धा आहे की, मणिकर्णिका घाटावर ज्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात, त्याला थेट ‘मोक्ष’ प्राप्त होतो. म्हणजेच तो आत्मा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. काशी खंड या ग्रंथानुसार, येथे देहत्याग करणाऱ्या किंवा अंत्यसंस्कार होणाऱ्या व्यक्तीच्या कानात स्वतः भगवान शिव ‘तारक मंत्र’ फुंकतात, ज्यामुळे त्या आत्म्याला सद्गती मिळते. याच कारणामुळे भारताच्या कानाकोपऱ्यातून वृद्ध आणि आजारी लोक आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस घालवण्यासाठी काशीत येतात.
मणिकर्णिका घाटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील चितांचा अग्नी कधीही विझत नाही. येथे वर्षभरात ३६५ दिवस सुरू असतात. एका पाठोपाठ एक मृतदेह येथे आणले जातात. डोळ्यांसमोर जळणाऱ्या चिता, मंत्रोच्चार आणि गंगेचा संथ प्रवाह यामुळे येथील वातावरण एकाच वेळी वैराग्य आणि शांततेचा अनुभव देते.
या घाटावर आगळ्यावेगळ्या प्रथा प्रचलित आहे त्यापैकी एक म्हणजे राखेची होळी (मसाण होळी) देशभरात जिथे रंगांची होळी खेळली जाते, तिथे काशीमध्ये रंगपंचमीच्या सुमारास मणिकर्णिका घाटावर चितेच्या राखेने (भस्माने) होळी खेळली जाते. भगवान शिव आपल्या गणांसह येथे होळी खेळतात, अशी धारणा आहे.
त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीच्या काळात येथे रात्रीच्या वेळी देशातील विविध भागांतून आलेल्या नगरवधू (वेश्या) महादेवाच्या दरबारात नृत्य सादर करतात. पुढील जन्मी आपल्याला हे दलदलीचे आयुष्य मिळू नये, अशी प्रार्थना त्या देवाकडे करतात.
मान्यतेनुसार, मणिकर्णिका घाट हा केवळ मृत्यूचा घाट नाही, तर तो मानवी जीवनाची नश्वरता आणि अध्यात्माची सर्वोच्च पायरी दर्शवणारे स्थान आहे. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती संसारातील मोह-माया विसरून काही काळासाठी का होईना, वैराग्य अनुभवतो. गंगेच्या काठावर जळणाऱ्या चिता माणसाला आयुष्याचे अंतिम सत्य काय आहे, याची जाणीव करून देतात.
मणिकर्णिका घाटाला आधुनिक आणि भक्कम स्वरूप देण्यामध्ये मराठा साम्राज्याचे मोठे योगदान आहे. १८ व्या शतकात (१७३० च्या सुमारास) आपल्या महाराष्ट्रातील होळकर घराण्याच्या महान राज्यकर्त्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी या घाटाचा जीर्णोद्धार केला. त्यांनी घाटाच्या पायऱ्या, मणिकर्णिका कुंड आणि जवळील मंदिरांचे बांधकाम करून या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाला एक नवी ओळख दिली.
असे मानले जाते की, मणिकर्णिका घाट हा माणसाला अहंकाराची आणि जगाच्या नश्वरतेची जाणीव करून देतो. श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाचा शेवट याच राखेत होणार आहे, हा शाश्वत संदेश हा घाट दर सेकंदाला देत असतो. म्हणूनच, काशीला भेट देणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूसाठी मणिकर्णिका घाटाचे दर्शन हे जीवनाचा एक अविस्मरणीय आणि डोळे उघडणारा अनुभव ठरते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मणिकर्णिका घाट हा उत्तर प्रदेशातील वाराणसी (काशी) येथे गंगा नदीच्या तीरावर स्थित आहे. हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र घाटांपैकी एक मानला जातो.
Ans: हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार, मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार झाल्यास आणि काशीमध्ये प्राणत्याग झाल्यास मोक्षप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे हा घाट अत्यंत पवित्र मानला जातो.
Ans: या घाटावर वर्षभर, दिवस-रात्र अंत्यसंस्कार सुरू असतात. त्यामुळे मणिकर्णिका घाटाला 'महास्मशान' म्हणून ओळखले जाते.






