
दशकभराचा मान्सून अंदाज शक्य
आयआयटीएमची नवी हवामान प्रणाली चर्चेत
मान्सूनवरील परिणाम नेमकेपणाने प्रणाली यशस्वी
पुणे: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी – आयआयटीएम) यांनी विकसित केलेल्या दशकभराच्या नव्या हवामान अंदाज प्रणालीवरील संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ‘आयआयटीएम दशक हवामान अंदाज प्रणाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभ्यासात भारतीय उन्हाळी मान्सूनमधील वर्षानुवर्षे आणि दशकानुसार होणारे बदल, जागतिक हवामान घटकांशी त्याचे संबंध आणि प्रणालीची अचूकता यांचे सविस्तर मूल्यमापन करण्यात आले आहे. पावसाचे वितरण, तापमानातील त्रुटी तसेच विविध जागतिक हवामान चक्रांचा मान्सूनवरील परिणाम अधिक नेमकेपणाने दर्शविण्यात ही प्रणाली यशस्वी ठरल्याचे अहवालात नमूद आहे.
हा अहवाल पी. व्ही. राजेश, रोसिमिथा पांडा, सी. ज्ञानसीलन, राहुल पाई, रश्मी काकतकर, दर्शना पाटेकर, जे. एस. दीपा, ए. जी. प्रजीश, अमित कुमार शर्मा, टी. एस. फौसिया, सुब्रतो हलदर, अनिला सेबॅस्टियन, अनंत पारेख आणि सैकत प्रमाणिक यांनी तयार केला आहे.
ही नवी प्रणाली आयआयटीएमच्या पूर्वीच्या पृथ्वी प्रणाली नमुन्यावर आधारित असून, एक ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी अधिक विश्वासार्ह हवामान अंदाज देण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे. जागतिक स्तरावरील दशकभराच्या हवामान अंदाज उपक्रमातही या प्रणालीचे योगदान राहणार आहे. या सुधारित प्रणालीमध्ये जमिनीचे विविध प्रकार, मृदेचे वर्गीकरण, वनस्पतींची माहिती, पृष्ठभागाची खडबडीतता, खोल मृदेचे तापमान, भूप्रदेशाची रचना, वातावरणातील सूक्ष्म कण, हरितगृह वायू, ओझोन आणि सौर प्रभाव यांचा सखोल विचार करण्यात आला आहे. त्यामुळे जमीन आणि वातावरण यांतील परस्परसंवाद अधिक वास्तवदर्शी झाला असून पाऊस, तापमान आणि आर्द्रतेचे अंदाज अधिक अचूक मिळत आहेत.
अहवालानुसार, या प्रणालीमुळे मध्यम अक्षांशांतील तापमानातील त्रुटी कमी झाल्या आहेत. भारतातील वार्षिक पावसाचे चित्र, विशेषतः मुख्य मान्सून पट्ट्यातील पर्जन्यमान, अधिक वास्तवदर्शीपणे सादर करण्यात आले आहे. मान्सून वाऱ्यांची दिशा व तीव्रता, ऋतूमधील चढ-उतार आणि वरच्या वातावरणातील तापमानातील बदल यांचेही समाधानकारक अनुकरण करण्यात आले आहे.
Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न
तसेच प्रशांत आणि अटलांटिक महासागरातील दीर्घकालीन हवामान चक्रे व त्यांचा भारतीय मान्सूनवरील परिणाम यांचेही प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. काही बाबींमध्ये, विशेषतः समुद्रपृष्ठ तापमानातील तफावत आणि सूक्ष्म कण–ढग परस्परसंवाद, अधिक सुधारणा आवश्यक असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. आयआयटीएमची ही नवी प्रणाली मान्सून संशोधनासाठी महत्त्वाची झेप मानली जात असून शेती, जलसंपदा नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन व अधिक अचूक हवामान अंदाज देण्यात ती उपयुक्त ठरणार आहे.