
Despite having talented athletes suffer a disadvantage due to the lack of sports ground satara news
Satara News : श्रीरंग काटेकर : सातारा : सातारा शहराच्या वैभवशाली क्रीडा संस्कृतीची केवळ क्रीडांगणा अभावी वाताहत झाल्याचे चित्र पाहायला मिळते. साताऱ्यातील असंख्य खेळाडू क्रीडा (Sports News) सरावासाठी पुणे व अन्य शहरात जाऊन सराव करत आहेत. सातारा शहर व ग्रामीण भागात गुणी व होतकरू खेळाडू मोठ्या प्रमाणात असून त्यांना सरावासाठी क्रीडांगणच उपलब्ध होत नसल्याने त्यांची मोठी कुचुंबना होत आहे. चार मंत्र्यांचा जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यभर ओळख असणाऱ्या सातारा शहरात (Satara News) सुसज्ज व अद्यावत क्रीडांगण नाही ही खरी तर नामुष्कीची बाब आहे.
क्रीडा सरावासाठी खेळाडूंना पुणे व अन्य शहरांकडे धाव घ्यावी लागते यामुळे त्यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. मन, मेंदू आणि मनगटाच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडांगणाकडे चला ही शासनाची भूमिका असताना मात्र साताऱ्यात या विषयाला हरताळ फासला जात आहे. उपलब्ध क्रीडांगणाच्या जागेवर खासगी व्यावसायिक अकॅडमी वाल्यांनी कब्जा केल्याने व विविध शासकीय उपक्रमाचे सातत्याने सराव असल्याने खेळाडूंना सरावासाठी इतरत्र भटकंती करावी लागते ही दुर्दैवी बाब आहे.
हे देखील वाचा : “तुम्हाला हवे आहे म्हणून लगेच पाठिंबा द्यायचा का? बारामतीचा विषय संजय राऊतांनी एकाच वाक्यात संपवला
सातारा शहरात एकमेव शाहू स्टेडियम हे विकसित करताना या ठिकाणी खेळाडूंचा उत्कर्ष हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी स्टेडियमची उभारणी केलेली होती. प्रारंभीच्या काळात या ठिकाणी खेळाडूंसाठी अद्यावत सुविधा उपलब्ध होत होत्या तसेच या क्रीडांगणावर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा ही मोठ्या प्रमाणात होत होत्या. या ठिकाणी क्रिकेटचे रणजी स्तरावरील सामने नियमित पणे होत असल्याने त्या काळात सातारचे अनेक खेळाडूंनी रणजी क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. यामध्ये वाईचे अफजल पठाण, पाचगणीचे विशाल भिलारे, सातारचे केतन दोशी, महेश कारंजकर, रणजीत चव्हाण, रोहन भोसले व अन्य खेळाडूंनी रणजी स्पर्धेत मोठी कामगिरी करून सातारचा नावलौकिक उंचावला होता . साताऱ्यात त्या काळात होत असलेले विविध क्रिकेट सामने व अन्य सामन्यांमुळे खेळाडूंच्या मध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले होते. अनेक खेळाडूंनी यातून प्रेरणा घेऊन आपले करिअर उज्वल घडविले होते. सातारच्या क्रीडा परंपरेचा इतिहास जागवणाऱ्या या खेळाडूंमुळे सातारचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाले होते.
मात्र सध्या साताऱ्यात खेळाडूंसाठी क्रीडांगणच उपलब्ध नसल्याने क्रिकेट, फुटबॉल, ॲथलेटिक्स या खेळाचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे खेळाडूंमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. केवळ क्रीडांगणा अभावी खेळाडूंचे होत असलेले नुकसानीमुळे सातारकर नागरिकांमध्येही तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. अनेक गुणवंत व होतकरू खेळाडूंना आपली गुणवत्ता यामुळे सिद्ध करता येत नाही. केवळ क्रीडांगण नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सातारा शहरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने क्रिकेटचे रणजी स्तरावरील स्पर्धा ही होऊ शकल्या नाहीत ही दुर्दैवी बाब आहे. याबाबत लोकप्रतिनिधीना ही खंत देखील नाही.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवारांसमोर आकाश मोरेंचे तगडे आव्हान? काँग्रेसने का दिली मोरेंना संधी?
तसे पहिले तर सातारा शहराचा क्रीडा इतिहास मोठा विलक्षण आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत येथील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमटून सातारचे नाव क्रीडा क्षेत्रात गाजवलेले आहे. यामध्ये ऑलम्पिक वीर कुस्तीपटू खाशाबा जाधव, सायकलिंगमध्ये मयूर पवार, धावपटू म्हणून नंदा जाधव, ललिता बाबर, सुलताना खान, सुदेष्णा शिवणकर बरोबरच धर्नुविदया अर्जुन पुरस्कार विजेते अदिती स्वामी यांनी भरीव कामगिरी करून दाखवली आहे. अर्थात यासाठी त्यांना अन्य शहरातील क्रीडांगणावर व स्पर्धेवर अवलंबून राहावे लागले आहे. साताऱ्यात क्रीडांगण उपलब्ध नसल्यामुळे नियमितपणे या ठिकाणी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करता येत नाही ही क्रीडा संघटने पुढील मोठी समस्या आहे. सातारच्या खेळाडूंसाठी व क्रीडांगण उपलब्धीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशी सातारकरांची मागणी आहे.
अनेक गुणी व होतकरू खेळाडू साताऱ्यात असून त्यांना केवळ क्रीडांगण उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या गुणवत्तेवर व करिअरवर परिणाम होत आहे. सातारच्या क्रीडा परंपरेचा वैभवशाली इतिहास निर्माण करण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या सातारच्या मंत्र्यांनी यामध्ये पुढाकार घेणे आता गरजेचे वाटू लागले आहे. खेळाडूंच्या वेदना व व्यथा हे त्यांनी जाणून सातारमध्ये सुसज्य व अद्यावत क्रीडा संकुल उभारणीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा की ज्यामुळे सातारच्या खेळाडूंना अन्य शहरातील क्रिडांगणावर अवलंबून राहता येणार नाही.
सत्तेचा वापर हा जनहितासाठी व्हावा ही अपेक्षा
महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारे सातारच्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेत त्यांना मोठा मान व सन्मान आहे. तब्बल चार मंत्र्यांचा बहुमान सातारा जिल्ह्याला लाभला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या रूपाने उपमुख्यमंत्री पदाची ही माळ सातारा जिल्ह्याला लाभली आहे. एवढी मोठी संधी जिल्ह्याला प्राप्त होऊन ही सातारच्या खेळाडूंची सरावासाठी भटकंती काही संपेना. हा जिल्हा यशवंत विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तसाच क्रीडा रत्नाची खाण म्हणूनही हा जिल्हा ओळखला जातो. सातारकरांना या लोकप्रतिनिधी कडून मोठ्या अपेक्षा आहेत. सत्तेचा वापर हा जनहितासाठी व्हावा ही अपेक्षा आहे. डोक्यात सत्तेची हवा असली तरी मनात मात्र सेवाभाव वृत्ती हवी तरच विकास व प्रगतीचे चक्रे गतिमान होतात हे जिल्ह्याच्या यशवंत नितीने सिद्ध करून दाखवून दिले आहे.