
India crash out of semi-final race
सामन्याच्या सुरुवातीलाच अर्जेंटिनाने भारतावर दबाव निर्माण केला. खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या ४० सेकंदांतच अर्जेंटिनाच्या तोस्कानीने मैदानी गोल करून आघाडी घेतली. यानंतर लगेचच, ७ व्या मिनिटाला निकोलस डेला टोरीने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून अर्जेंटिनाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. १० व्या मिनिटाला सुखजीत सिंगने एका उत्कृष्ट गोलने भारताला कमबॅक करण्याची संधी दिली. परंतु, पहिल्या क्वार्टरमध्ये अर्जेंटिना २-१ ने आघाडीवर होता.
भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील या सामन्यात दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. ३३ व्या मिनिटाला अर्जेंटिनाने आणखी एक गोल करून स्कोअर ३-१ असा केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटिनाने आणखी एक गोल करून ४-१ अशी आघाडी घेतली. यादरम्यान भारतीय खेळाडूंनी अनेक चुका केल्या आणि त्यांचा डिफेन्स कमकुवत दिसत होता. भारतीय खेळाडू दबावाखाली असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.
मात्र, ३४ व्या मिनिटाला भारताला सलग चार पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि कर्णधार हरमनप्रीत सिंगला गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली. परंतु, अर्जेंटिनाच्या मजबूत डिफेन्समुळे भारतीय संघाला कोणत्याही संधीचे सोने करता आले नाही. अर्जेंटिनाचा खेळाडू डोमेनने सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये वर्चस्व गाजवले, तर भारतीय गोलरक्षक मोहितने काही उत्कृष्ट डिफेन्स केला. यशदीपने केलेल्या फाऊलमुळे अर्जेंटिनाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, जो डोमेनने सहजपणे गोलमध्ये रूपांतरित केला. भारताने शेवटच्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि अखेरीस भारताने सामना ५-३ ने हरला.
या हॉकी विश्वचषकाची दुसरी फेरी भारतीय संघासाठी निराशाजनक ठरली. संघाला नेदरलँड्सकडून ३-१ असा पराभव पत्करावा लागला. तसेच, पहिल्या फेरीत इंग्लंडकडून सामना गमावल्यामुळे भारताला प्लेऑफसाठी एकही गुण मिाला नाही. याशिवाय दुसऱ्या फेरीत एकही गुण मिळवण्यात अपयशी ठरल्याने भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.