श्रेयस अय्यर जखमी(फोटो-सोशल मिडिया)
IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी दोन सामने जिंकून २-० अशी आघाडी घेऊन मालिका जिंकली आहे. आता तिसरा सामना भारताला जिंकणे गरजेचे आहे. त्याच उद्देशाने मैदानात उतरेलल्या भारताला मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु चालू सामन्यादरम्यान संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाज अॅलेक्स केरी आणि मॅट रेनशॉ क्रीजवर असताना ही घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियाचे धावफलकावर १८३ धावा लागलेल्या होत्या, दरम्यान, हर्षित राणाच्या चेंडूवर केरीने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला खरा पण चेंडू हवेत उंच उडाला आणि श्रेयस अय्यरने एक शानदार झेल घेण्यासाठी मागे धाव घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, झेल घेताना अय्यरचे तोल गेला आणि तो जमिनीवर अचानक पडला. तो पडताना तो वेदनेने ओरडला आणि काही वेळ मैदानावर तसाच पडून राहिला.
श्रेयस अय्यरची प्रकृती पाहून संघाचे फिजिओ ताबडतोब मैदानावर धावत सुटले. सुरुवातीच्या उपचारानंतर देखील अय्यरच्या चेहऱ्यावर वेदना दिसून येत होत्या. वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी थोडक्यात चर्चा केल्यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. त्याची दुखापत किती गंभीर आहे आणि तो फलंदाजी करू शकेल वा नाही? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. या प्रकरणावर संघ व्यवस्थापनाकडून अद्याप काही एक अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी सिडनी सामन्यात खेळत नाहीयेत; त्याच्या जागी कुलदीप यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला विश्रांती देऊन त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा : IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 237 धावांचे लक्ष्य! सिडनीत हर्षित राणाचा ‘चौकार’
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय या मालिकेतील तिसरा सामना आज सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत मॅथ्यू रेनशॉच्या अर्धशतकाच्या जोरावर ४६.४ ओव्हरमेध्ये सर्वबाद २३६ धावा उभ्या केल्या आहेत. भारताला विजयासाठी २३७ धावा कराव्या लागणार आहे.






