
पोत्यात भरली पोरं अन् १० वर्षांच्या योजनेनंतर अखेर कुटुंबाने नार्थ कोरीयातून केले पलायान; स्वातंत्र्याची थरारक कहाणी
हुकुमशाहीतून स्वत:ची सुटका करुन घेणं प्रत्येकाला जमण्यासारखी गोष्ट नाही. पण किम इल-ह्योक आणि किम यी-ह्योक या दोन भावांनी गुलामगिरीच्या या बेड्या तोडण्याचा दृढनिश्चय केला होता. १० वर्षांपूर्वी आपल्या वडिलांनी पाहिलेले स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्या भावांनी आपला जीव धोक्यात घातला. पलायनासाठी निवडलेला दिवस होता ६ मे २०२३, जेव्हा समुद्रातील वादळामुळे रक्षकांची दृष्टी अंधुक झाली होती.
माध्यमांच्या वृत्तानुसार , हा प्रवास इतका धोकादायक होता की, ४ आणि ६ वर्षांच्या मुलांना पोत्यांमध्ये कोंबण्यात आलं होतं, जेणेकरून त्यांचा किंचितसा रडण्याचा आवाज पथकापर्यंत पोहोचू नये. इतकेच नव्हे तर, घरातील महिलांना भूसुरुंगांनी भरलेल्या भागातून जावे लागले. त्यांची एक छोटीशी चूक त्यांची कुटुंबाला नष्ट करु शकली असती. किमची पत्नी त्यावेळी पाच महिन्यांची गर्भवती होती. सुरुवातीला हा धोका पत्कारण्यासाठी ती तयार नव्हती पण आपल्या न जन्मलेल्या बाळाला एक उज्वल भविष्य देण्यासाठी तिने हा धोका स्वीकारला.
त्यांनी जलमार्गाने देश सोडण्याचा निर्णय घेतला होता. ज्यासाठी दोन्ही भावांनी मच्छीमार असल्याचे भासवत तटरक्षक दलाचा विश्वास संपादित केला. ते अनेकदा आपली बोट सीमेजवळ नेऊन ती परत मागे आणत असत जेणेकरुन रक्षकांनी त्यांच्या उपस्थितीची सवय व्हावी. त्या वादळी रात्री त्यांनी रक्षकांना लाच दिली आणि अंधाराचा फायदा घेत आपली बोट थेट दक्षिण कोरियाच्या दिशेने वळवली. त्यांच्यासोबत त्यांच्या वडिलांची राखही होती, जी त्यांना त्या बंदिस्त देशात सोडून जायची नव्हती.
जेव्हा त्यांनी सीमा ओलांडून दक्षिण कोरियाच्या सागरी हद्दीत प्रवेश केला तेव्हा तिथल्या चमचमत्या दिव्यांनी त्यांचे डोळे उजळवून काढले. त्यांना समजलं की त्यांनी अंधारातून प्रकाशात प्रवेश घेतला आहे. दुर्दैवाने ज्या भावाने १० वर्षे या योजनेची आखणी केली त्याला हे स्वांतत्र्य फार काळ पाहता आले नाही. स्वातंत्र्यानंतर अवघ्या १९ महिन्यांतच, डायव्हिंगच्या अपघातात लहान भावाचा मृत्यू झाला.