
होर्मुजचा तिढा सोडवण्यासाठी जागतिक हालचाली! (Photo Credit- X)
बैठकीदरम्यान यवेट कूपर यांनी इराणच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. इराणने हा मार्ग रोखणे किंवा जहाजांना लक्ष्य करणे, हा केवळ लष्करी संघर्ष नसून “जागतिक आर्थिक सुरक्षेवर झालेला थेट हल्ला” असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इराणच्या या बेजबाबदारपणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा पुरवठा गंभीर धोक्यात आला आहे, असा दावा ब्रिटनने केला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत माहिती दिली की, ब्रिटनकडून भारताला या बैठकीसाठी विशेष निमंत्रण मिळाले होते. भारतासाठी हा मार्ग खालील कारणांमुळे अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताची एलएनजी (LNG) आणि कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर याच मार्गावरून होते. सध्या या भागात सुमारे २,००० जहाजांवर २०,००० नाविक अडकले आहेत, ज्यामध्ये भारतीय खलाशांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.
ब्रिटीश परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या भागात 25 हून अधिक जहाजांवर हल्ले झाले आहेत. यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर खालीलप्रमाणे परिणाम झाला आहे:
1. आशिया: लिक्विड नॅचरल गॅस (LNG) पुरवठ्यात मोठे अडथळे.
2. आफ्रिका: खतांच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न.
३. जागतिक बाजार: जेट फ्युएल (विमानाचे इंधन) पुरवठा विस्कळीत झाल्याने विमान वाहतूक महागण्याची शक्यता.
कुवैत, बहरीन, कतार, यूएई, सौदी अरेबिया, ओमान आणि इराक यांसारख्या आखाती देशांच्या व्यापार मार्गांनाही या कोंडीचा फटका बसला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघात (UN) तब्बल 130 देशांनी इराणच्या या आक्रमक कृतीचा निषेध केला आहे. ब्रिटनने स्पष्ट केले आहे की, अमेरिका आणि इस्रायलच्या मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून इराणने हा मार्ग बंद केला असला, तरी या संघर्षात थेट सहभागी नसलेल्या देशांना वेठीस धरणे अन्यायकारक आहे. हे संकट कूटनीतिक मार्गाने सोडवण्यासाठी ब्रिटन आता जागतिक समुदायाचे नेतृत्व करत आहे.