
( फोटो सौजन्य : IANS)
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार पश्चिम आशिया आणि खाडी क्षेत्रातील बदलत्या घडामोडींवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. विशेषतः जे भारतीय नागरिक कामानिमित्त अल्पकाळासाठी तिथे गेले होते किंवा जे विमान प्रवासादरम्यान तेथे अडकले आहेत, त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. या भागात राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांनी स्थानिक प्रशासनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, संबंधित देशांतील भारतीय दूतावास आणि कॉन्सुलेटने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
परिस्थिती हाताळण्यासाठी भारतीय दूतावास आणि कॉन्सुलेटने २४ तास सुरू राहणाऱ्या हेल्पलाइन सेवा कार्यान्वित केल्या आहेत. या हेल्पलाइनद्वारे अडकलेल्या प्रवाशांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शंकांचे निरसन केले जात आहे. एवढेच नाही तर, परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीत एक विशेष ‘कंट्रोल रूम’ देखील स्थापन केली आहे, जी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या काही दिवसांत संबंधित भागातील Airspace अंशतः खुले करण्यात आले आहे. याचा फायदा घेत भारतीय आणि परदेशी विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे पुन्हा सुरू केली आहेत. व्यावसायिक उड्डाणांसोबतच अनेक ‘नॉन-शेड्यूल्ड’ विमानेही चालवली जात आहेत, जेणेकरून अडकलेल्या भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी आणता येईल.
आकडेवारीनुसार, १ ते ७ मार्च या कालावधीत आतापर्यंत 52000 हून अधिक भारतीयांनी या विमान सेवांचा लाभ घेतला असून ते सुखरूप भारतात परतले आहेत. यापैकी सुमारे ३२,१०७ नागरिकांनी भारतीय विमान कंपन्यांचा वापर केला आहे. ज्या ठिकाणी अद्याप व्यावसायिक उड्डाणे उपलब्ध नाहीत, तिथल्या भारतीयांनी जवळच्या दूतावासाशी संपर्क साधून उपलब्ध पर्यायांची माहिती घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. केंद्र सरकार सध्या खाडी देशांतील स्थानिक सरकारांच्या संपर्कात असून प्रत्येक गरजू भारतीयापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे.