जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर काय होईल, सर्वात जास्त नुकसान कोणाला होईल? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India America Business : भारत आणि अमेरिका या दोन जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आज एकमेकांच्या महत्त्वाच्या व्यावसायिक भागीदार ठरल्या आहेत. दरवर्षी या दोन देशांमध्ये अब्जावधी डॉलर्सचा व्यापार होतो. मात्र, कल्पना करा की जर काही कारणास्तव भारताने अमेरिकेकडून खरेदी करणे थांबवले किंवा या दोन देशांमधील व्यापार पूर्णपणे बंद झाला, तर सर्वात जास्त फटका कोणाला बसेल?
भारताची अर्थव्यवस्था अजूनही विकसनशील टप्प्यात आहे आणि जागतिक व्यापारावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अमेरिका ही भारताची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे. औषधनिर्माण, आयटी सेवा, कापड, रत्ने आणि दागिने यांसारख्या क्षेत्रातील उत्पादनांचा मोठा हिस्सा अमेरिकेतच जातो. जर व्यापार अचानक थांबला तर या उद्योगांना जबरदस्त फटका बसेल. यामुळे लाखो नोकऱ्यांवर संकट ओढवेल. भारतीय आयटी क्षेत्राची कमाईपैकी जवळपास ६० टक्के उत्पन्न अमेरिकेतूनच येते, त्यामुळे त्याला सर्वाधिक धक्का बसेल. शिवाय परकीय चलन साठा, नवीन गुंतवणूक आणि स्टार्टअप क्षेत्रावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा
२०२३-२४ या आर्थिक वर्षात भारत-अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार सुमारे ११८ अब्ज डॉलर्स इतका झाला. यात भारताने अमेरिकेला ७७ अब्ज डॉलर्सची निर्यात केली, तर अमेरिकेतून ४१ अब्ज डॉलर्सची आयात केली. याचा अर्थ भारताचा जवळपास ३६ अब्ज डॉलर्सचा व्यापार अधिशेष अमेरिकेसोबत आहे. त्यामुळे जर हा व्यापार थांबला तर भारतासाठी तोटा जास्त ठरेल.
अमेरिका ही जगातील सर्वात मोठ्या आणि वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यामुळे भारताशी व्यापार थांबला तरी अमेरिकेला पर्यायी बाजारपेठा मिळणे अवघड नाही. हो, इतकं मात्र खरं की जेनेरिक औषधे अमेरिकेसाठी महाग होतील. कारण भारतीय औषध कंपन्या अमेरिकेला मोठ्या प्रमाणात स्वस्त औषधे पुरवतात. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स, कपडे यांसारख्या काही वस्तूंमध्ये अडचण निर्माण होईल. पण दीर्घकाळासाठी अमेरिका सहज नवीन पुरवठादार शोधून हा तुटवडा भरून काढू शकेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
या सर्व परिस्थितीकडे पाहता, व्यापार थांबला तर भारताला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वाधिक फटका बसेल. लाखो नोकऱ्या धोक्यात येतील, उद्योगांना जबर तोटा सोसावा लागेल, आणि निर्यात बाजारपेठ कोलमडेल. दुसरीकडे, अमेरिकेला तुलनेने मर्यादित फटका बसेल, कारण त्यांच्याकडे पर्यायी पुरवठादार आणि मोठी अर्थव्यवस्था आहे. म्हणूनच तज्ज्ञांचे मत आहे की भारत-अमेरिका व्यापार संबंध हे केवळ आर्थिक नव्हे तर धोरणात्मकदृष्ट्याही महत्त्वाचे आहेत. अशा कोणत्याही तणावपूर्ण परिस्थितीपासून दोन्ही देशांनी दूर राहणे हेच दोघांच्या हिताचे ठरेल.