Nepal Floods: नेपाळमधील त्रिभुवन त्रिशुली शाळेची थरारक कथा; बोधी वृक्षाखाली एकत्र आली मुले अन् डोळ्यांदेखत वाहून गेली शाळा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
नेपाळच्या (Nepal Floods) नुवाकोट जिल्ह्यात निसर्गाने धारण केलेल्या रौद्ररुपादरम्यान एका मुख्याध्यापकाच्या समयसूचकतेमुळे महाभयंकर अनर्थ टळला आहे. त्रिशुली खोऱ्यातील त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांच्या प्रसंगावधानामुळे शाळेतील तब्बल १,६४३ मुलांचा जीव वाचला आहे. पर्वतीय भागात हिमनदी फुटल्याने लेंडी नदीला अचानक विनाशकारी पूर आला आणि पाण्याचा वेगवान प्रवाह थेट मानवी वस्त्यांकडे आणि शाळेच्या दिशेने धावून आला. परंतु, वेळेवर घेतलेल्या एका निर्णयामुळे शेकडो कुटुंबांचे चिमुकले सुखरूप बचावले आहेत.
ही घटना बुधवारी सकाळी सुमारे ९:२० वाजता घडली. ४७ वर्षीय इंग्रजी शिक्षक आणि मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी हे नेहमीप्रमाणे शाळेत दैनंदिन कामात व्यस्त होते. त्याच वेळी त्यांना एका मित्राचा घाईघाईत फोन आला. मित्राने त्यांना सांगितले की, नदीकाठचे एक संपूर्ण गाव पुरात वाहून गेले असून पाण्याचा प्रचंड लोंढा वेगाने खाली येत आहे, त्यामुळे तातडीने सुरक्षित ठिकाणी पळून जा! सुरुवातीला तीन मजली पक्की इमारत नदीपासून ६० मीटर उंचावर असल्याने शाळा सुरक्षित असेल असा अंदाज त्यांनी बांधला होता. मात्र, काही वेळातच एका पालकाने प्रत्यक्ष येऊन पाणी अतिशय वेगाने वाढत असल्याचे सांगितल्यावर परिस्थितीचे गांभीर्य दवाडी यांच्या लक्षात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
त्यावेळी शाळेच्या तीन मजली इमारतीत आणि परिसरात एकूण १,६४३ मुले उपस्थित होती. थोडाही विलंब झाला असता तर शेकडो चिमुकल्यांचा बळी गेला असता. दवाडी यांनी क्षणाचाही विलंब न करता शाळेची आणीबाणीची घंटा वाजवण्याचे आदेश दिले आणि सर्व शिक्षकांना वर्गखोल्या रिकाम्या करून मुलांना बाहेर काढण्यास सांगितले. त्यांनी तात्काळ सर्व बस चालकांना फोन करून गाड्या मागे फिरवण्याच्या सूचना दिल्या.
How a headmaster, Rajendra Dadabi, saved the lives of 1643 kids through his decisive leadership and presence of mind in a school in Trishuli, Nepal devastated by the flash floods! 🙏pic.twitter.com/cQs7lnXPhA — Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) August 30, 2026
credit – social media and Twitter
अचानक आलेल्या या संकटामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका विद्यार्थिनीला पॅनिक अटॅक आल्याने तिला तत्काळ दुचाकीवरून डोंगराच्या दिशेने पाठवण्यात आले. इतर सर्व मुले शिक्षकांच्या देखरेखीखाली डोंगराच्या सुरक्षित भागाकडे धावू लागली. राजेंद्र दवाडी स्वतः सर्वात शेवटी राहून प्रत्येक मूल सुरक्षितपणे पुढे जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवून होते. संपूर्ण शाळा पूर्णपणे रिकामी होईपर्यंत ते स्वतः तिथेच थांबले होते.
मुलांना आणि कर्मचाऱ्यांना डोंगरावरील एका उंच ठिकाणी असलेल्या बोधी वृक्षाखाली सुरक्षितपणे एकत्र जमवण्यात आले. तिथे पोहोचून सुरक्षित स्थळी उभे राहिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मागे वळून पाहिले, तर त्यांच्या अंगावर काटा आला. ज्या तीन मजली इमारतीत काही मिनिटांपूर्वी मुलांचा गलबला आणि किलबिलाट सुरू होता, ती संपूर्ण इमारत महापुराच्या रौद्र प्रवाहात क्षणात पत्त्यांसारखी कोलमडून वाहून गेली. जिथे शाळा उभी होती, तिथे आता फक्त चिखल, खडक आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह दिसत होता.
या अभूतपूर्व मोहिमेत सर्व १,६४३ मुले सुरक्षितपणे वाचली असली तरी, दुर्दैवाने शाळेतील दोन कर्मचाऱ्यांचा जीव वाचवता आला नाही. इतिहास विषयाचे ३२ वर्षीय शिक्षक संतोष परिहार हे नाश्ता बनवण्यासाठी नदीकाठच्या आपल्या खोलीवर गेले असता पुरात वाहून गेले. तर शाळेचे पहारेकरी सुलतान लामा हे इमारतीचे दरवाजे बंद करण्यासाठी मागे फिरल्याने पाण्याच्या प्रवाहात अडकून मृत्युमुखी पडले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा
हा विनाशकारी पूर लांगटांग लिरुंग शिखरावरून बर्फ आणि खडकाचा मोठा साठा कोसळल्यामुळे लेंडी नदीत अचानक आला होता. या महापुरात नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवरील अनेक गावे नष्ट झाली असून शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.
आज संपूर्ण जग आणि नेपाळचे नागरिक राजेंद्र दवाडी यांना ‘रिअल हिरो’ म्हणून सलाम करत आहेत. परंतु, अत्यंत नम्रपणे दवाडी म्हणतात, “माझ्या जागी कोणता ही शिक्षक असता तरी त्याने हेच केले असते. मुलांची सुरक्षा ही माझी पहिली जबाबदारी होती”. त्यांच्या या अद्भूत प्रसंगावधामुळे शेकडो कुटुंबांचे दीप विझण्यापासून वाचले आहेत.






