नेपाळच्या पुरात भारतीयांची चिंता वाढली! 288 जणांशी संपर्क तुटला, MEA ची मोठी माहिती
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी गुरुवारी (27 ऑगस्ट 2026) माध्यमांना याबाबत माहिती दिली. पूरग्रस्त भागातील परिस्थिती सातत्याने बदलत असून भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी आणि अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संपर्क होऊ न शकलेल्या 288 भारतीयांमध्ये विविध गटांचा समावेश आहे. यामध्ये त्रिशूली-I ऊर्जा प्रकल्पावर काम करणारे लोक, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील काही गट, केरळमधील एक गट तसेच विविध टूर ऑपरेटरच्या माध्यमातून नेपाळमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीयांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व नागरिकांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.
मानसरोवर यात्रेसाठी गेलेले अनेक भारतीय चीनच्या बाजूला अडकल्याची माहितीही परराष्ट्र मंत्रालयाने दिली. सुमारे 200 भारतीय नागरिकांनी या भागातून बाहेर पडण्यासाठी भारत सरकारकडे मदत मागितल्याचे रणधीर जायसवाल यांनी सांगितले. उपलब्ध माहितीनुसार, यापैकी 95 भारतीय गारचन परिसरात असून ते नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठी बिल्साच्या दिशेने जात आहेत. चार भारतीय जीलोंग शहरात, तर 13 जण झुटुलपो परिसरात असून ते सागा शहराच्या दिशेने जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मात्र परिस्थिती वेगाने बदलत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अडकलेल्या नागरिकांच्या ठिकाणांबाबतची माहितीही बदलू शकते.
पूरग्रस्त भागातून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रणधीर जायसवाल यांच्या माहितीनुसार, तमिळनाडूतील 21 भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. उर्वरित भारतीयांचा शोध घेण्यासाठी भारतीय यंत्रणा नेपाळ तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
पूर आणि त्यानंतरच्या बचावकार्याच्या पार्श्वभूमीवर भारताने नेपाळला मदतीचा हात दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारताने आतापर्यंत एकूण 47.5 टन आपत्कालीन मदत सामग्री नेपाळला पाठवली आहे. काठमांडूसाठी दोन विमानांमधून मानवीय मदत पाठवण्यात आली. या हवाई मदतीत एकूण आठ टन औषधे आणि एक टन खाद्यपदार्थांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. नेपाळच्या मागणीनुसार भारताकडून आणखी मदत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
नेपाळमधील या नैसर्गिक आपत्तीच्या काळात भारत शेजारी देशासोबत खंबीरपणे उभा असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. बचाव आणि मदतकार्याला आवश्यक सहकार्य सुरू ठेवण्याची भूमिका भारताने घेतली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तिबेटमधील हिमनदीशी संबंधित घटनेनंतर चीन-नेपाळ सीमावर्ती भागात अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. दिलेल्या आकडेवारीनुसार, मृतांची संख्या 290 पर्यंत पोहोचली असून 1,300 हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. बेपत्ता नागरिकांमध्ये परदेशी पर्यटक आणि धार्मिक यात्रेसाठी या भागात आलेल्या लोकांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
वेगवेगळ्या यंत्रणांकडून जाहीर होणाऱ्या मृत आणि बेपत्ता नागरिकांच्या आकडेवारीत तफावत दिसू शकते. दुर्गम भागातील संपर्क व्यवस्था विस्कळीत होणे, माहिती गोळा करण्याची वेगवेगळी वेळ, आकडेवारीची पडताळणी आणि विविध बचाव पथकांमधील समन्वय या कारणांमुळे आकडे बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या स्थितीबाबत परराष्ट्र मंत्रालय आणि संबंधित अधिकृत यंत्रणांकडून जाहीर होणारी अद्ययावत माहिती महत्त्वाची ठरणार आहे.
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूर आणि भूस्खलनाच्या गंभीर परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील ७ पर्यटक नेपाळमध्ये अडकले असून, त्यापैकी मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी दोन अशा चार पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला आहे. हे चारही पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली असून, उर्वरित तीन पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकारने टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक १०७० तसेच राज्य नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२२-६९१०७६०० उपलब्ध करून दिला आहे. राज्य नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात आला असून, नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे.






