
फोटो सौजन्य सोशल मीडिया
नेपाळी लष्कराने अत्यंत प्रतिकूल हवामान आणि वेगाने वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात बचावमोहीम राबवत ३५० कामगार आणि स्थानिक नागरिकांची सुटका केली आहे. मात्र, बोगद्यात अजूनही १०० हून अधिक जण अडकले असल्याची माहिती असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
२६ ऑगस्टला नेपाळ-तिबेट सीमेवरील हिमालयीन भागात झालेल्या हिमनदी कोसळण्याच्या घटनेनंतर प्रचंड पाणी, दगड, चिखल आणि मलबा नदीच्या प्रवाहात आला. यामुळे रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला अचानक मोठा पूर आला. या पुराचा फटका त्रिशूली जलविद्युत प्रकल्पालाही बसला.
पुराचा वेग इतका प्रचंड होता की प्रकल्प परिसरातील रस्ते आणि पूल वाहून गेले. बोगद्याच्या प्रवेशमार्गावरही मोठ्या प्रमाणात चिखल आणि मलबा साचला. त्यामुळे आत अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे बचाव पथकांसाठी मोठे आव्हान बनले.
PoK Politics : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सत्तांतर; PML-Nचे इफ्तिखार गिलानी नवे ‘पंतप्रधान’
नेपाळी लष्कराने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर आणि विशेष बचाव पथकांची मदत घेतली. बोगद्याचा प्रवेशमार्ग शोधणेही कठीण झाले होते. पुराचे पाणी, चिखल आणि खराब हवामानामुळे बचावकार्य अत्यंत धोकादायक बनले होते.
अशा परिस्थितीत जवानांनी बोगद्यापर्यंत पोहोचून आत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ३५० जणांची सुटका करण्यात यश आले आहे. त्यामध्ये कामगारांसोबत काही स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे.
मात्र, १०० हून अधिक जण अजूनही अडकले असल्याने बचाव पथकांची शर्यत सुरू आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असून, बोगद्यातील परिस्थिती आणि बाहेरचा पुर यामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणी येत आहेत.
Iran-US Tension : अमेरिकेच्या आर्थिक दबावाविरोधात इराण आक्रमक; सर्व देशांना दिला इशारा
त्रिशूली बोगद्यातील दुर्घटना ही नेपाळमध्ये सध्या सुरू असलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा एक भाग आहे. हिमनदी कोसळल्यानंतर निर्माण झालेल्या प्रचंड पाण्याच्या लोंढ्याने नदीकाठच्या भागांमध्ये मोठी हानी केली आहे.
रसुवा जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते, पूल, घरे आणि जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बचाव पथकांना प्रभावित भागांपर्यंत पोहोचणेही कठीण झाले आहे.
दरम्यान, त्रिशूली बोगद्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे हे प्रशासनासमोर सध्या सर्वात मोठे आव्हान आहे. नेपाळी लष्कराकडून बचावकार्य सुरू असून, खराब हवामान आणि संभाव्य नव्या पुराच्या पार्श्वभूमीवर जवानांना अत्यंत सावधगिरीने मोहीम राबवावी लागत आहे.