E20 इंधनामुळे इंजिन सुरक्षित; 60 हजार किमी चाचण्यांत यशस्वी ठरली वाहने (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पुणे : E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) इंधनामुळे वाहनांच्या इंजिनावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नसून, 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंतच्या व्यापक चाचण्यांमध्ये इंजिनची दीर्घकालीन कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सिद्ध झाली आहे, अशी माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)चे संचालक यांनी दिली.
कोथरूड येथील एआरएआयच्या मुख्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत E20 इंधनाशी संबंधित ग्राहकांच्या शंका, वाहनांची टिकाऊ क्षमता आणि इंधन कार्यक्षमतेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. E20 सुसंगत प्रत्येक वाहन बाजारात आणण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय निकष आणि मूळ उपकरण उत्पादकांच्या (ओईएम) मानकांनुसार कठोर प्रमाणीकरण व पडताळणी प्रक्रियेतून जात असल्याचे डॉ. मथाई यांनी स्पष्ट केले.
भारतात फॅन्सी हॉर्नवर बंदी का आहे? जाणून घ्या RTO चे नियम आणि दंडाची रक्कम
त्यांनी सांगितले की, विविध हवामान, रस्ते आणि वापराच्या परिस्थितींमध्ये वाहनांची प्रत्यक्ष तसेच प्रयोगशाळेत कसून चाचणी केली जाते. या प्रक्रियेत इंजिन, इंधन प्रणाली, इंधनवाहिन्या आणि इतर महत्त्वाच्या घटकांवर इथेनॉल मिश्रणाचा परिणाम तपासला जातो. या सर्व चाचण्यांमध्ये वाहनांची कामगिरी समाधानकारक आढळली असून इंजिनच्या दीर्घकालीन आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नसल्याची पुष्टी झाली आहे.
प्रमाणित प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये E20 इंधनामुळे इंधन कार्यक्षमतेत केवळ 2 ते 6 टक्क्यांपर्यंतच घट आढळून आली आहे. मात्र प्रत्यक्ष वापरातील इंधनाचा खर्च वाहन चालविण्याची पद्धत, रस्त्यांची स्थिती आणि वाहनाची देखभाल यांसारख्या घटकांवर अवलंबून असतो, असेही त्यांनी नमूद केले.
वाहनधारकांनी कंपनीच्या शिफारशीनुसार नियमित सर्व्हिसिंग अधिकृत सेवा केंद्रातून करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. भारताच्या इथेनॉल मिश्रित इंधन धोरणाला चालना देण्यासाठी वाहन उद्योग पूर्णपणे सज्ज असून, ग्राहकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार E20 सुसंगत वाहने उपलब्ध करून देण्यास उद्योग कटिबद्ध असल्याचे एआरएआयने स्पष्ट केले.






