नवीन टेक्नॉलॉजी येणार ! अपघात होण्यापूर्वी वाहनेच देतील अलर्ट, V2V टेक्नॉलॉजी फायद्याची ठरणार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली : देशातील रस्त्यांवरील प्राणघातक अपघात आणि वाहनांमधील धडक टाळण्यासाठी केंद्र सरकार एक मोठे पाऊल उचलत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे, ज्यानुसार 1 ऑक्टोबर 2028 पासून सर्व नवीन दुचाकी, तीनचाकी, कार, बस आणि ट्रक वाहन-ते-वाहन (V2V) संवाद प्रणालीने सुसज्ज असणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. ज्या वाहनांमध्ये ही प्रणाली आधीपासूनच आहे, त्यांना 1 ऑक्टोबर 2027 पर्यंत संबंधित मानकांचे (एआयएस-२३०) पालन करणे आवश्यक असेल.
जर अपघात झाला असेल किंवा वळणाच्या पलीकडे वाहने थांबली असतील, तर ही प्रणाली वळणापूर्वी चालकाला सतर्क करेल. V2V तंत्रज्ञानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही मोबाईल किंवा सेल्युलर नेटवर्कशिवाय काम करते. वाहनांमध्ये बसवलेले हे उपकरण लहान रेडिओ सिग्नलद्वारे जवळपासच्या इतर वाहनांना त्याचे स्थान, वेग, दिशा आणि ब्रेकिंगबद्दल रिअल टाइम डेटा देईल.
जर पुढच्या वाहनाने अचानक ब्रेक लावला, असुरक्षितपणे लेन बदलली, चुकीच्या दिशेने गाडी चालवली किंवा रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन वाहनाजवळ आले, तर चालकांना डॅशबोर्डद्वारे किंवा बीपच्या आवाजाद्वारे तात्काळ सूचना मिळतील.
दुसऱ्या टप्प्यात वाहने पायाभूत सुविधांशी जोडणार
V2V नंतर, सरकार व्हेईकल-टू-इन्फ्रास्ट्रक्चर (व्हीटूआय) तंत्रज्ञान देखील लागू करेल. याअंतर्गत, रस्ते, वाहतूक सिग्नल, विजेचे खांब, पूल आणि उड्डाणपूल यांवर सेन्सर बसवले जातील, जे वाहनांना रस्त्यांची स्थिती आणि बांधकाम कामांबद्दल थेट माहिती देतील.
ऑडी इंडियाचा मोठा प्लॅन
दुसरीकडे, ऑडी इंडिया आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करण्यावर, ग्राहकांच्या अनुभवाला अधिक आनंददायी करण्यावर आणि देशभरात आपली उपस्थिती वाढवण्यावर भर देत वाढीच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत आहे. कंपनीने २०२७ पर्यंत तीन नवीन उत्पादने लाँच करण्याची पुष्टी केली आहे, ज्याची सुरुवात आगामी सणासुदीच्या काळात नवीन ऑडी क्यू३ ने होईल, त्यानंतर २०२७ मध्ये नेक्स्ट-जनरेशन ऑडी ए५ आणि फ्लॅगशिप ऑडी क्यू९ लाँच केली जाईल.






