कोरोनाच्या काळात अवघ्या जगात टाळेबंदी होती. सर्व जगाचे व्यवहार ठप्प झाले होते. कोरोनाची आलेली आपत्ती ही इष्टापत्ती समजून अनेक साहित्यिक आणि कलावंतांनी तसेच विविध चॅनल्सनी आपापल्या माध्यमातून आविष्कृत होण्याची संधी ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवली.
कोरोनाचे संकट सर्वदूर पसरलेले असताना अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारामुळे शिवाजी गावडे यांना रुग्णालयात भरती व्हावं लागले. त्यांच्या पोटावर एक दीर्घ शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णशय्येवर असताना, प्रकृती सुधारताना त्यानी मोबाईलवरून अनेक कार्यक्रमांचा आस्वाद घेणं सुरू केले. यात व्हॉटस्अपवरची कोरोनावरची विडंबनपर कविता त्यांना भावली. त्यातून त्यांना हॉस्पिटलमध्येच कोरोना विषयावरचा कवितासंग्रह प्रकाशित करण्याची कल्पना सुचली.
शिवाजी गावडे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्रातल्या मान्यवर कवींपासून नवोदित कवींपर्यंत सर्वांना कविता पाठविण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक कवितांचे संकलन म्हणजे ‘कोरोनाच्या कविता’.
प्रस्तुत संग्रहातील कविता वाचनीय आहेत. त्यांना एका विशिष्ट घटनेची पार्श्वभूमी असली तरी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे गरीबांपासून ते श्रीमंतापर्यंत, मजूर ते कारखानदार, शिपाई ते अधिकारी या सर्व स्तरातील व्यक्तींवर झालेल्या परिणामाकडे सर्वच कवींनी आपापल्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. हे या कवितासंग्रहाचे वेगळेपण म्हणावे लागेल.
कवितासंग्रहाच्या आरंभीच डॉ. नीला सत्यनारायण यांची ‘बाहेरचं जग’ ही कविता आहे. महामारीच्या वातावरणामुळे सगळीकडेच आलेल्या रितेपणाबद्दल त्या लिहितात –
‘बाहेरचे जग मला दिसत नाही
रस्त्यावर सामसूम आहे
येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा आवाज
मला ऐकू येत नाही
माझ्या जगात आहे आथा
निळं निळं आभाळ…’
अभूतपूर्व अशा महामारीने लाखो मृत्यू पावत आहेत. हतबलता आली आहे. उपचार करणारे डॉक्टरच लागण होऊन रुग्ण होत आहेत. सगळीकडे भीती, साशंकता… अंधारमय भविष्य! अशोक बागवे त्यांच्या ‘अनोळखी’ या कवितेत सांगतात –
पुढे पुढे लोक अनोळखी होत जातील…
देव-धर्म वर्गकलह सर्व
विरहात विभागले जातील
भूगोलावरचा इतिहास गुदमरेल
संस्कृतीला सुसंस्कृतात नसेल
ग्लोबल महामारीची स्तोत्रे लिहावी लागतील…
हीच आर्तता आणि भयानकता कवी अशोक नायगांवकर यांनी त्यांच्या ‘सगळ्या एनसायक्लपीडितांना…’ या कवितेत व्यक्त केली आहे.
हे असेच घडत राहिले
तर
‘उद्या’
नक्कीच मार खाणार
कालनिर्णय दुरुस्त करावं लागणार
अधिक मार्च, अधिक एप्रिल, अधिक मे
बंद करा हा ट्वेंटी ट्वेंटीचा खेळ
स्टेडियमचं हॉस्पिटल झालंय…
अचानक झालेल्या महामारीने प्रत्येकाच्या मनावर भीतीचे सावट असताना आपला वाली कोण? याचे उत्तर सापडत नाही. माणसाच्या अशाश्वतेवर कवी रामदास फुटाणे लिहितात –
लॉक डाऊन उठता उठता
धर्मस्थळे ही गजबजली
‘कॉरन्टाईन’ प्रबुद्ध सारी
हतबल होऊनी कुजबुजली…
जरी पेटल्या घराघरातून
विज्ञानाच्या वाती
इथे उगवते श्रद्धा भक्ती
भाविक भावूक माती
शिवाजी गावडे यांनी संकलित केलेल्या या कवितांची पार्श्वभूमी एकच असली तरी त्यात वैविध्यता आहे. जगदीश भोवड त्यांच्या ‘करो… ना!’ कवितेत म्हणतात –
जेव्हा जात होतो कामावर
तेव्हा नवरोबा होते ‘बिझी’
समस्त पत्नींच्या आदेशांना
टाळीत होते ‘ईझी’
आता ‘ये करो ना… वो करो ना’
टाळता येत नाही सहजी!
कमलाकर राऊतांची ‘आखलेल्या अंतराचे’ ही गझल अतिशय बोलकी आहे.
आखलेल्या अंतराचे भान आम्ही पाळले
चेहऱ्याने चेहऱ्याला पाहणेही टाळले
हात हाती घेत होते प्रेमभावे भेटता
आज त्यांनी संगतीला राहणेही टाळले
थोडक्यात, टाळेबंदीमुळे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रांत किंबहुना सर्वच क्षेत्रात झालेल्या परिणामाला कवींनी कवितेचा विषय बनविला आहे.
प्रस्तुत कवितासंग्रहातील काव्यलेखनात मुक्तछंदापासून ते छंदोबद्ध, वृत्तबद्ध काव्य, भावगीत, गझल, पोवाडा, लावणी, विडंबन अशा वेगवेगळ्या काव्यप्रकारांतून ११५ कवी व्यक्त झाले आहेत.
हे कवितांचे संकलन शिवाजी गावडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कवयित्री डॉ. नीला सत्यनारायण व गावडे यांच्या सासुबाई सुधाताई ठाकरे यांना अर्पण केला आहे. कवितासंग्रहाला नयन बारहाते यांचं कालानुरूप मुखपृष्ठ आहे.
त्या काळातील भयावह वास्तव त्या मुखपृष्ठातून साकार झाले आहे. गावडे यांचे एम.ए.चे वर्गमित्र कमलाकर राऊत यांची छोटेखानी पण समर्पक अशी प्रस्तावना आहे.
रुग्णशय्येवर असताना महामारीच्या कवितांवर पुस्तक काढण्याचे शिवाजी गावडे यांचे धैर्य वाखणण्याजोगे आहे.
कोरोनाच्या कविता
संपादक : शिवाजी गावडे
मुखपृष्ठ : नयन बारहाते
प्रकाशक:संवेदना प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १२८, मूल्य : रूपये- १५०/-
– प्रा. रघुनाथ शेटकर
raghunathshetkar0@gmail.com






