योगदर्शन, उपनिषदे, भगवद्गीता यांच्याशी घट्ट नाळ जोडलेली महाराष्ट्रामधील व संपूर्ण भारतामधील एक मध्ययुगीन अर्थपूर्ण, सधन अशी परंपरा म्हणजे “संत परंपरा”. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, विठुरायाशी, पंढरीच्या वारीशी जोडलेली प्रदीर्घ संत परंपरा हे आपले अत्यंत महत्त्वाचे सांस्कृतिक संचित आहे. या संत परंपरेमध्ये मानवी मन, वर्तन, सभ्यता, संस्कृती आणि समाजाविषयी अतिशय प्रदीर्घ, सखोल अभ्यास, समज आपल्याला आढळून येते. या संपूर्ण सांस्कृतिक संचिताचा आस म्हणजे मन आहे. या मनाच्या आसाभोवती मानवी वर्तन व संस्कृतीचे वर्तुळ गुंफलेले आहे. ते नेहमीच तसे असते. एकीकडे मानवी मनाविषयीची, वर्तनाविषयीची सखोल समज तर दुसरीकडे संपूर्ण मानव जाती विषयीचा कळवळा, यामुळे संत परंपरेचे संचित मानवी इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण समजले जाते.
वरती म्हटल्याप्रमाणे संपूर्ण संत परंपरेचा भर हा मनाच्या शुद्धीकरणावर, मनाला उन्मार्गी लावण्यावर आणि हा शुद्ध भाव सातत्याने प्रयत्नपूर्वक वर्तनामध्ये परिवर्तित करण्यावर राहिलेला आहे. यातूनच नवे नवे आदर्श, नवे दंडक, नवे सांस्कृतिक आयाम, या परंपरेने उभे केले आहेत. उदा. संत नरसी मेहता म्हणतात,
‘वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड परायी जाणे रे ।
पर दुःखे उपकार करे तो ये, मन अभिमान न आणे रे ॥
सकल लोकमां सहुने वंदे, निंदा न करे केनी रे ।
वाच काछ मन निश्चळ राखे, धन धन जननी तेनी रे ॥
समदृष्टि ने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मात रे ।
जिह्वा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे ॥
मोह माया व्यापे नहि जेने, दृढ़ वैराग्य जेना मनमां रे ।
रामनाम शुं ताली रे लागी, सकल तीरथ तेना तनमां रे ॥
वणलोभी ने कपटरहित छे, काम क्रोध निवऱ्या रे ।
भणे नरसैयॊ तेनुं दरसन करतां, कुल एकोतेर तार्या रे ॥
वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड परायी जाणे रे । ”
वैष्णव जनांची लक्षणे विषद करणारे हे सुंदर भजन. ईश्वराचे भक्त, विष्णूभक्त हे बिरुद मिरवायचे असेल तर कसा वर्तन-व्यवहार गरजेचा आहे हे इथे मांडले आहे. नैतिकता ही कोणत्याही आध्यात्मिक विकासाची पूर्व अट आहे, हे अधोरेखित करणारे हे भजन. महात्मा गांधीजींचे अत्यंत लाडके भजन. महात्मा गांधीजींचा संदर्भ देण्याचे कारण म्हणजे ते नेहमी म्हणत की, “महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांचे सत-प्रवृत्त, सदभावी कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. कित्येक मोठी कामे आणि मोठे कार्यकर्ते गांधीजींना महाराष्ट्रात लाभले. तुकोबा निळोबांप्रमाणे महात्मा गांधीजींनी विनोबांना संतांच्या मांदियाळीत बसवले. पाचशे वर्ष सुरू असलेली ही प्रदीर्घ परंपरा, केवळ विचारांवर आधारित नाही तर सामाजिक सद्-भाव, शुद्ध अंत:करण आणि सत्शील वर्तन यावर बेतलेली आहे. या परंपरेमुळेच जातींची उतरंड समाजाने पेलली, परकीय आक्रमणे झेलली. छत्रपती शिवरायांकडे अनेक योग्य लढवय्ये पाठवले, प्रपंचासोबत परमार्थ करायला शिकवले. वेगवेगळे आदर्श समाजामध्ये निर्माण केले.
संतानी मानवी मनाचा स्वतंत्र असा विचार केला आहे. ह्या परंपरेच्या छायेत अर्वाचीन तसे आधुनिक काळात मराठी मन व मराठी समाज पोसला गेला आहे. अगदी आधुनिक काळाची साक्ष घेऊन बोलायचे झाल्यास, विनोबांची भूदान चळवळ वा कुष्ठरोगी सेवेचे बाबा आमटे यांचे व्रत, अशी अनेक प्रारूपे कुठेतरी या संतपरंपरेशी जोडली गेली आहेत. “जे जे भेटे भूत ते ते मानवी भगवंत” ह्या उक्तीवर आधारित प्रत्येकाचा व्यवहार राहिला आहे. आधुनिक काळात स्वामी विवेकानंदांनी राबवलेला “शिवभावे जीव सेवा” हा विचार देखील या परंपरेशी नाते सांगणारे उदाहरण आहे. महात्मा गांधींच्या म्हणण्यानुसार, संत परंपरेमुळे त्यांना शुद्ध मन, शुद्ध भाव असलेली माणसे महाराष्ट्रात मिळाली.
संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा पंथ म्हणजे भक्ती पंथ. ज्ञानोबांनी “फुलवलेला, गुंफलेला, मनातला मोगरा तोही विठ्ठलाला अर्पण” आणि “मना सज्जना” म्हणत, या मनाला “प्रभाते मनी राम चिंतीत जावा” असा सतत सल्ला देणारे समर्थ रामदास यांनी घेतलेला रामरायाचा ध्यास. थोडक्यात काय तर, संत ज्ञानदेव असोत वा नामदेव किंवा “अणुरेणिया थोकडा । तुका आकाशाएवढा ।।” असे म्हणणारे तुकोबा असोत अथवा “शुद्ध मन व शुद्ध आचरण हीच केवळ खऱ्या ब्राह्मण्याची लक्षणे आहेत” असे मानणारी व त्यावर वज्रसूची उपनिषदाचा अनुवाद करणारी संत बहिणाबाई असोत, सर्वांनी एकच गोष्ट सांगितलेली आढळते आणि ती म्हणजे मनाची अविरत मशागत. हे सगळे करताना मनाचा जो स्वभाव आहे, तो ह्या संताना पक्का ठाऊक आहे आणि म्हणूनच त्यांनी कुठेतरी सातत्याने मनाची मशागत करण्याला, समष्टीसोबत मशागत करण्याला आधुनिक भाषेत बोलायचे झाल्यास “योग्य मार्गदर्शकासोबत (Correct Mentor)” उपासना करण्याला खूपच महत्त्व दिले आहे. आपल्या परंपरेनुसार मन हे जलतत्त्वाचे बनले आहे, असे मानले जाते आणि म्हणूनच संत ज्ञानदेव म्हणतात, “खालोरा धावे पाणी”. सतत खालच्या बाजूने धावत जाणे, हाच मानवी मनाचा धर्म आहे आणि म्हणूनच सुसंस्कारांची, रोजच्या मशागतीची मनाला अत्यंत गरज आहे.
आज या परंपरेचा पगडा कुठेतरी कमी झालेला आहे, असे वाटते. आपला समाज-भावही संकुचित झालेला आहे, असे जाणवते. आत्मसंतुष्टी, उपयुक्ततावादी, चंगळवादी झालेला आजचा समाज पुन्हा एकदा मनाच्या मशागतीची गरज अधोरेखित करतो. सर्वच संतांनी वेगवेगळ्या परीने त्या-त्या काळातील सामाजिक आव्हाने पेललेली दिसतात. मनात सतत दडून बसलेल्या विविध विकारांना, आळा घालून मनाला वैयक्तिक व सामाजिक पातळीवर सन्मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न सर्वच संतांनी केलेला आहे. आधुनिक काळामधील मानसतज्ञ “मासलो” यांच्या सिद्धांतानुसार, संतांनी आत्मविकासाला व आत्मपूर्तीला (Self Actualization motivation) खूप महत्त्व दिले आहे.
खाली धावणाऱ्या मनाला वर जाण्यास मदत केली आहे. त्यानुसार मनाची मशागत करण्याचा प्रयत्न केला आहे. खरे म्हणजे संतांचे हे प्रयत्न हा एका स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. पण एखादे उदाहरण घ्यायचे झाल्यास, आपण संत एकनाथांचे उदाहरण घेऊ शकतो. संत एकनाथांनी संसार, स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही पेलला. त्या काळच्या अनेक नाट्यकला व किर्तन कलांचा त्यांनी अतिशय खुबीने वापर करून, बहुजनांना सन्मार्ग दाखवण्याचे कार्य केले.
एकनाथांची बहुआयामी भारुडे तर आजही अत्यंत लोकप्रिय आहेत. लोकांच्या रोजच्या जगण्यातली उदाहरणे घेऊन, कधी प्रेमाने आंजारून-गोंजारून, तर कधी चिमटा काढून, मनाचा व्रात्यपणा, मनाचा अवघडपणा, मनाचे खाली झेपावणे, बहुजनांना समजावून दिले. उदा. “तमोगुण मागे सारून” मनाचे उत्थात करण्याचा उपदेश देताना संत एकनाथ म्हणतात,
“ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरें झरझरा ।
किंचित राहिली फुणफुण । शांती केली जनार्दनें।। ”
संतांनी दिलेला मनाच्या मशागतीचा एक सोपा महामंत्र म्हणजे “नामयोग”. तशी अनेक साधने संतांनी सांगितली आहेत, पण कोणालाही कधीही सहज शक्य असलेले साधन म्हणजे “नामयोग”. मन उन्मार्गी लावण्यासाठी संतांनी निवडलेली ही मात्रा आहे, ते एक कौशल्य आहे. नामयोगाविषयी पुढील लेखात विचार करू.
डॉ. सुचित्रा नाईक
naiksuchitra27@gmail.com






