
(फोटो सौजन्य:Chatgpt)
सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. सोनं खरेदी न करण्याच आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. त्यात आपल्याच भारतात सोन्याचा मोठा साठा असल्याची बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील एका बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कुर्नूल जिल्ह्यातील जोन्नागिरी गावात सोन्याचा मोठा साठा सापडला असल्याचं समोर येत आहे. ज्यामुळे येत्या काही वर्षांत हे राज्य देशातील सर्वात मोठे सोन्याचे उत्पादक राज्य बनणार आहे.
अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, या ठिकाणी अंदाजे ५० टन सोने असू शकते. राज्याचे खाण सचिव मुकेश कुमार मीना यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशात सोन्याच्या खाणकामासाठी चार प्रमुख ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये जोन्नागिरी, रामगिरी, जाववाकुला आणि चिगुरुकुंटा बिस्नाथम यांचा समावेश आहे. पण जोन्नागिरीमध्ये सर्वाधिक क्षमता असल्याचं नमुद करण्यात आलं आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुमारे १० वर्षांपूर्वी जोन्नागिरीमध्ये खाणकामासाठी १,५०० एकर जमीन मंजूर करण्यात आली होती. व्यावसायिक सोने उत्पादन आधीच सुरू झाले आहे, ही दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत केवळ ५०० एकर जमिनीचे अन्वेषण झाले असून, तिथे १३ टन सोने सापडेल असा अंदाज आहे. उर्वरित १,००० एकर जमिनीचे अन्वेषण पूर्ण झाल्यावर, एकट्या जोन्नागिरीमध्ये एकूण ५० टन सोने सापडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू या महिन्याच्या अखेरीस जोन्नागिरी सुवर्ण खाण प्रकल्पाचे अधिकृतपणे उद्घाटन करतील.
सोने काढणे हे सोपे काम नाही. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की यासाठी भरीव आर्थिक संसाधने आणि विशेष कौशल्याची आवश्यकता असते. म्हणूनच सरकारने हे काम खाजगी कंपन्यांना निविदा काढून सोपवले आहे. आणखी एक मोठे आव्हान म्हणजे खाणींमधून सोने काढण्याचा वेग मंदावला आहे. आजकाल, १ टन म्हणजेच १००० किलो ढिगारा किंवा कच्चा माल चाळल्यावर फक्त १ ग्रॅम सोने मिळते. पूर्वी, तेवढ्याच ढिगाऱ्यातून अंदाजे ३ ग्रॅम सोने मिळत असे. तज्ञांचे म्हणणे आहे की, जर १ टन ढिगाऱ्यातून ०.८ ग्रॅमपेक्षा कमी सोने मिळाले, तर उत्खननाचा खर्चही वसूल होत नाही.
‘या’ डिफेन्स स्टॉकचा Stock Market मध्ये धुमाकूळ! सरकारकडून मिळालंय तब्बल 425 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट