
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अहिल्यानगरच्या प्रमुख बाजारपेठेत कोकणासह इतर राज्यांतूनही आंब्याची आवक सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी आणि देवगड हापूस चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या हापूस आंब्याला सर्वाधिक मागणी आहे.
लालबाग आणि मैसूर: परराज्यातून आलेल्या या आंब्यांनीही बाजारपेठ व्यापली आहे.
पायरी: आम्ररसासाठी खास वापरल्या जाणाऱ्या पायरी आंब्याचीही खरेदी जोरात सुरू आहे.
यंदा आंब्याचे दर ऐन सणासुदीत गगनाला भिडले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे आखाती देशांमध्ये सुरू असलेले युद्ध. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन दरात झालेले बदल आणि मालवाहतुकीवर झालेला परिणाम यामुळे आंब्याच्या वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. परिणामी, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आंब्याचे भाव ४०० ते ७०० रुपयांनी वधारले आहेत.
शहरातील प्रतिष्ठित आणि जुनी ओळख असलेल्या ‘आहूजा आंबा पेढी’ मध्ये सकाळपासूनच ग्राहकांचा ओघ सुरू आहे. सण असल्याने दरात वाढ होऊनही नागरिक परंपरेनुसार आंबा खरेदीला प्राधान्य देत आहेत. दर्जेदार आंब्यासाठी ही पेढी ओळखली जात असल्याने येथे हापूस आणि देवगड आंब्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
सध्या बाजारपेठेत दोन डझनच्या पेटीचे दर खालीलप्रमाणे आहेत:
हापूस आंबा (साधारण): १४०० ते १६०० रुपये (दोन डझन)
देवगड हापूस (उच्च दर्जा): १८०० रुपये (दोन डझन)
“यंदा नैसर्गिक हवामानाचा फटका आणि आखाती देशातील युद्धाचा परिणाम यामुळे आंब्याचे दर मागील वर्षापेक्षा जास्त आहेत. वाहतूक खर्च वाढल्याने आम्हालाही जादा दराने विक्री करावी लागत आहे. मात्र, अक्षय तृतीयेचा उत्साह असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत आहेत.”
– जगदीश आहूजा, प्रसिद्ध आंबा विक्रेते, अहिल्यानगर
वाढत्या महागाईनंतरही अहिल्यानगरकरांमध्ये सणाचा उत्साह कायम असून, उद्याच्या अक्षय तृतीयेसाठी घरोघरी आम्ररसाचा गोडवा चाखण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत.