
: 'दावोस' द्वारे नगरमध्ये तब्बल 12 हजार कोटींची गुंतवणूक!
सुपे (ता. पारनेर) येथील एमआयडीसीमध्ये ‘तौरल इंडिया’ कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार भागवत कराड, आमदार काशिनाथ दाते, सुरेश धस, विक्रमसिंह पाचपुते, तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक भरत गीते, तसेच थोनी अॅल्युमिनियमचे लोथर थोनी (जर्मनी) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात उद्योगधंदे वाढीस लागावेत यासाठी राज्यातील उद्योजकांनी राज्याचे दूत म्हणून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. उद्योगांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. पुढील 5 वर्षे उद्योगांसाठी वीजदर स्थिर ठेवण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये काही उद्योजकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून, कोणत्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. उद्योजकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
तौरल इंडियाचा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेअंतर्गत आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन देशातच होणे काळाची गरज आहे. परदेशातून आयात होणारे अनेक औद्योगिक घटक आता महाराष्ट्रातच, तेही भरत गीते यांच्यासारख्या उद्योजकांमुळे तयार होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. उद्योग उभारणीबरोबरच तो पर्यावरणपूरक असणे आवश्यक असून, या प्रकल्पात ‘सस्टेनेबल कास्टिंग’ आणि ‘रिसायकलिंग’वर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, दावोस येथे झालेले करार केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात साकार होत आहेत. एका मराठी उद्योजकाने 500 कोटी रुपयांची उलाढाल करणारा उद्योग उभारणे हे निश्चितच प्रेरणादायी आहे. हेलिकॉप्टर, जहाजे आणि रस्तेबांधणीसाठी लागणारे अत्याधुनिक औद्योगिक घटक आता थेट अहिल्यानगरमध्ये तयार होत आहेत, ही जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी आहे.