
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Rashmi Group Mega Investment : ‘रश्मी ग्रुप’ने शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये मोठी घोषणा केली. कंपनीने पोलाद, ऊर्जा आणि खाणकाम या क्षेत्रांमध्ये ३५,००० कोटी रुपयांच्या नवीन गुंतवणूक करण्याची घोषणा करत मोठा निर्णय घेतला आहे. एका निवेदनात, त्यांनी हे स्पष्ट केलं की, आपली लोह आणि पोलाद उत्पादन क्षमता दरवर्षी अतिरिक्त 7 दशलक्ष टनांनी वाढवण्याची गरज आहे. यासाठी ३०,००० कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तर बीरभूम आणि पश्चिम बर्धमान जिल्ह्यांमध्ये संपादित करण्यात आलेल्या तीन कोळसा खाणी कार्यान्वित करण्यासाठी आणखी ५,००० कोटी रुपये खर्च करण्यात येतील.
जानेवारीमध्ये, या समूहाने तेलंगणा सरकारसोबत १२,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी सामंजस्य करार स्वाक्षरित केला. पण पश्चिम बंगालमधील प्रस्तावित विस्तारांबाबत कंपनीने प्रकल्पांचे सविस्तर तपशील, त्यांची नेमकी ठिकाणे, जमिनीची आवश्यकता किंवा अंमलबजावणीच्या सुधारित योजना अजूनही उघड केलेल्या नाहीत.
ऑक्टोबर २०२५ मध्ये, रश्मी समूहाने पुरुलिया जिल्ह्यात १०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून २.८ दशलक्ष टन क्षमतेचा Integrated Steel Plant आणि त्यासोबतच ४०० मेगावॅटचा ‘कॅप्टिव्ह पॉवर प्रोजेक्ट’ उभारण्याची योजना जाहीर केली होती. तत्कालीन राज्य सरकारनेदेखील या प्रकल्पासाठी सुमारे ९३८ एकर जमीन मंजूर केली होती. पण नुकत्याच करण्यात आलेल्या घोषणेमध्ये, पुरुलियाबाबतचा तो आधीचा प्रस्ताव ३५,००० कोटी रुपयांच्या नवीन गुंतवणूक आराखड्याचाच एक भाग आहे की नाही; अथवा प्रकल्पाची रचना, जमिनीचे वाटप किंवा कालमर्यादेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, याबद्दल कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.
संस्थेने सांगितले की, नवीन गुंतवणुकीच्या या योजनांमध्ये पुरुलिया, पश्चिम बर्धमान, बीरभूम, झाडग्राम आणि पश्चिम मेदिनीपूर या जिल्ह्यांचा समावेश असेल. कंपनीने दावा केला की, केवळ पोलाद उत्पादन क्षमतेच्या विस्तारातूनच सुमारे ३५,००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे; तर कोळसा खाण प्रकल्पांतून आणखी १५,००० रोजगार निर्माण होऊ शकतात. याबाबत समुहाने स्पष्ट केलंय की, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये यापूर्वीच सुमारे २५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सध्या या राज्यात त्यांचा १० MTPA क्षमतेचा पोलाद प्रकल्प, ८५० MW क्षमतेचा ‘कॅप्टिव्ह’ वीज प्रकल्प आणि १.४५ MTPA क्षमतेचा सिमेंट उत्पादन कारखाना कार्यरत आहे.
रश्मी ग्रुप’चे संयुक्त अध्यक्ष लाल बाबू चौरसिया म्हणाले की, मोठ्या प्रमाणावरील उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हे राज्य एक आशादायक औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. “आमची प्रस्तावित गुंतवणूक ही राज्याच्या भविष्याबद्दल आम्हाला वाटणारा गाढ विश्वास, तसेच शाश्वत औद्योगिक प्रगती, रोजगार निर्मिती आणि दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक विकासाप्रती असलेली आमची अटूट कटिबद्धता दर्शवते,” असे त्यांनी नमूद केले.