
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
‘द हिंदू’मधील एका वृत्तानुसार, काही पेट्रोल पंप मालकांनी म्हटले आहे की, इथेनॉलच्या आर्द्रता-शोषक गुणधर्मांमुळे म्हणजेच सभोवतालच्या वातावरणातील पाण्याचे कण आकर्षित करून धरून ठेवण्याच्या क्षमतेमुळे, पावसाळ्यात आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये त्यांच्या E20 च्या साठ्यात भेसळ होत आहे.
वास्तविक पाहता, पंपावरील सध्याच्या अंडरग्राउंड स्टोरेज टाक्या पारंपरिक पेट्रोलसाठी बनवलेल्या आहेत. त्या उच्च इथेनॉल प्रमाण असलेल्या इंधनासाठी नाहीत. परिणामी, पावसाळ्यात, भूमिगत इंधन टाकीतील आर्द्रतेमुळे इथेनॉल पाण्यासोबत टाकीच्या तळाशी जमा होते.
तज्ज्ञांनी सांगितलं की, “जर भूमिगत टाकीत साठवलेल्या E20 च्या साठ्यातील पाण्याचे प्रमाण 0.5% पेक्षा जास्त झाले, तर इथेनॉल, ओलावा शोषून घेण्याच्या त्याच्या प्रवृत्तीमुळे, पाण्यामध्ये मिसळते. यामुळे प्रावस्था विलगीकरणाची समस्या निर्माण होते, ज्यामध्ये पाणी आणि इथेनॉलचे मिश्रण टाकीच्या तळाशी स्थिरावते, तर पेट्रोलचा एक वेगळा थर वरच्या बाजूला तयार होतो.”
या परिस्थितीत, शुद्ध E20 ऐवजी, वाहनांमध्ये पाणी आणि इथेनॉलचे दूषित मिश्रण जाऊ शकतं. ज्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. वाहन एकतर सुरू होणार नाही किंवा थोड्या अंतरावर बंद पडतील. हा धोका किनारी भागांमध्ये सर्वाधिक दिसून येण्याची शक्यता आहे. जिथे जमिनीखालील पाण्याच्या उच्च प्रमाणामुळे टाक्या योग्यरित्या सील केल्या नसल्यास E20 चा साठा खराब होऊ शकतो.
या काळात, माइल्ड स्टीलच्या अंडरग्राउंड टाक्या आणि पाईपलाईनमध्ये गंज लागण्याचा धोका आणखी वाढतो, कारण आधी सांगितल्याप्रमाणे, इथेनॉलमध्ये पाणी शोषण्याची प्रवृत्ती असते, ज्यामुळे इंधनातील भेसळ वाढू शकते. पण काही जणांचे म्हणणे आहे की तेल कंपन्यांनी E20 तयार करण्यासाठी पेट्रोल वितरण युनिटमधील सील आणि वॉशरच्या जागी निओप्रीन रबर लावले आहे.