
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Crisil Intelligence च्या ताज्या ‘रोटी राईस रेट’ अहवालानुसार, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतींच्या आधारावर शाकाहारी आणि मांसाहारी थाळी तयार करण्यासाठी लागणारा सरासरी खर्च मोजण्यात आला आहे. हा महिन्याच्या रिपोर्टमध्ये, या किमतींमधील बदलांचा सर्वसामान्य व्यक्तीच्या खर्चावर होणारा परिणाम दाखवतो आणि धान्य, ब्रॉयलर चिकन व मसाले यांसारख्या प्रमुख वस्तूंच्या किमतींमधील या बदलामागील मुख्य कारणं स्पष्ट केलीत.
अहवालात म्हटले आहे की, “मार्च महिन्यात, गेल्या वर्षीच्या तुलनेत मांसाहारी थाळीची किंमत १ टक्क्याने कमी झाली आहे तर शाकाहारी थाळीची किंमत स्थिर राहिली आहे. बटाटे, कांदे आणि डाळींच्या कमी झालेल्या किमतींमुळे टोमॅटो, खाद्यतेल आणि इंधनाच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम दिसून आला आहे.
पश्चिम आशियातील तणावामुळे यावर्षी मार्चमध्ये खाद्यतेल (६%), स्वयंपाकाचा गॅस (१४%) आणि टोमॅटोच्या (३३%) किमती वाढल्या असल्या तरी, बटाटा आणि कांद्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे ही वाढलेली किंमत भरून निघाली आहे. याच काळात बॉयलरच्या किमतीत २% घट झाल्यामुळे, मार्च २०२५ च्या तुलनेत मार्च २०२६ मध्ये मांसाहारी थाळीच्या किमतीही १% ने स्वस्त झाल्या आहेत.
मार्च महिन्यात बटाट्याच्या किमती १३ टक्क्यांनी आणि कांद्याच्या किमती २५ टक्क्यांनी घसरल्या आहे. या काळात पिकांची विक्रमी आवक झाल्यामुळे किमतींमध्ये घसरण झाली आहे. शिवाय, युद्धामुळे निर्माण झालेल्या निर्यातीतील अडचणींमुळे देशांतर्गत साठ्यात वाढ झाली. कोल्ड स्टोरेज आणि बाजारपेठांमधून जुना साठा हटवला जात असल्यामुळे किमतींमध्ये घट झाली.
मार्चमधील नवरात्रीमुळे मागणी कमी झाली. शिवाय, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये, चिकन विक्रेते आणि पोल्ट्री कंपन्या यांच्यात नफ्याच्या प्रमाणावरून झालेल्या वादामुळे किमतीत २% घट झाली. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम जेवणांच्या थाळीच्या किमतीवर झाला आहे.